बाजारात खरेदीसाठी झुंबड
नवी मुंबईत नागरिकांना कोरोना नियमांचा विसर; रुग्ण वाढत असल्याने चिंता
तुर्भे, ता. ५ (बातमीदार) : गेल्या आठवड्याभरापासून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णांचा आलेख वाढत आहे. रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्याच्या उद्देशाने नवी मुंबई पालिकेने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, शहरात व गावागावात भरणाऱ्या आठवडे व दैनंदिन बाजारामुळे खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडत असून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन नवी मुंबई पालिकेने केले आहे. मात्र, ऐरोलीपासून बेलापूरपर्यंतच्या परिसरातील वाहतुकीच्या मुख्य रस्त्याला या अनधिकृत फेरीवाल्यांनी अक्षरश: विळखा घातल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता टाळता येत नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. सध्या शहरातील ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे सेक्टर १५, तुर्भे नाका, तुर्भे गाव, शिरवणे आदी ठिकाणी आठवडे बाजार भरवले जात आहेत. तर कोपरखैरणे गावात बुधवारी भरणारा आठवडे बाजार भरत नसला तरी रस्त्यावर दैनंदिन फेरीवाले आपले ठाण मांडून बसलेले असतात. काही गावात आठवडे बाजार जरी भरला जात नसला तरी दैनंदिन जीवनावश्यक वस्तू, कपडे, भांडी आदींचा बाजार भरतो. त्यामुळे दिवसभर तुरळक गर्दी असणारे रस्ते संध्याकाळ गजबजतात. यावेळी नागरिकांकडून नियम पाळण्यात यावे या अपेक्षेला धुडकवले जाते.
गेल्या काही महिन्यांपूर्वी कोरोना नियंत्रणात आला आणि फेरीवाल्यांची संख्या वाढत गेली. गेल्या आठवड्यात पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी नवी मुंबईतील नागरिकांना गर्दी टाळण्याचे आवाहन केले होते. असे असतानाही पालिकेच्या आठही विभागातील आठवडे व दैनंदिन बाजारात खरेदीसाठी शेकडोच्या संख्येने नागरिकांची झुंबड उडते. बहुतेक ठिकाणी रविवारी आठवडे बाजार हे वाहतुकीच्या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा भरविण्यात येत आहे. सध्या पालिकेचे भरारी पथक फिरत नसल्याने मास्क न घळणाऱ्यांना भीतीच उरलेली नाही.
चौकट
जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी गर्दी
नवी मुंबई मध्ये सोमवारी कोरोना रुग्ण संख्येने एक हजाराचा आकडा पार गेला होता. अद्यापि राज्यात कोरोना निर्बंध लागू असले तरी लॉकडाऊनच्या संभाव्यतेमुळे अनेकांनी जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी बाजारात गर्दी केली आहे.
कोट -----
आठवडे व दैनंदिन बाजार यांच्याबाबत आयुक्त नियमावली जाहीर करणार आहेत. तसेच मास्क न घालणाऱ्यांवर आजपासून पुन्हा कडक कारवाई सुरू केली जाईल.
- सुजाता ढोले, अतिरिक्त आयुक्त ,नवी मुंबई पालिका
कोट----
पालिका प्रशासनाने कोरोना वाढल्याने आठवडी बाजार बंद करावेत व दैनंदिन बाजरावर निर्बंध घालावेत. जेणेकरून सोशल डिस्टन्सिंग पाळले जाऊन गर्दी टाळली जाईल.
- निखिल वाघ ,नागरिक