आडमार्गाने वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांवर कारवाई
मनसेच्या कार्यकर्त्यांकडून वाहने अडवून आंदोलन
कासा, ता. ५ (बातमीदार) ः मुंबई-अहमदाबाद मार्गावरून धुंदलवाडी-मोडगाव मार्गे सायवन कासा या आडमार्गाचा वापर अनेक वाहने टोल चुकवण्यासाठी करत असतात. अनेक वाहने तलासरी- उधवा- सायवन- कासा या मार्गाने जात आहेत. खरे तर हा मार्ग जंगलातून अरुंद व चढ-उताराचा असल्याने यामुळे अनेक अपघात घडत आहेत. मोठ्या प्रमाणात सेल्वासा, दमण ही पर्यटन स्थळे पाहण्यासाठी प्रवासी तसेच खासगी वाहने गर्दी करीत आहेत. हा केंद्रशासित प्रदेश असल्याने या भागात मद्य स्वस्त मिळते. त्यामुळे अनेक मद्यप्रेमी येथे जात असतात. त्यात अनेक मद्यविक्रेते व गुटखा विक्रेते या परिसरातून जकात चुकवून येत असतात. त्यामुळे या रस्त्याची खराबी होत असून त्यात अनेक दुचाकीस्वार अपघातग्रस्त होत आहेत.
धुंदलवादी-मोडगाव मार्ग हा सायवन, कासा येथून ठाणे, नाशिक, मुंबईला जाण्यासाठी आडमार्ग आहे. अनेक मोठी वाहनेदेखील या रस्त्याने जकात, टोल चुकवण्यासाठी जात असतात, पण अवजड वाहने जाऊन या रस्त्याची वाईट अवस्था झाली आहे. यासाठी येथील लोकांनी आंदोलनेदेखील केली आहेत, पण कोणी दखल घेत नाही.
शेवटी ४ जानेवारी रोजी डहाणू मनसे तालुका अध्यक्ष उमेश गोवारी यांच्या नेतृत्वात रात्री ८ वाजल्यापासून कासा, सायवन नाक्यावर ओव्हरलोड, जकात चुकवून जाणारी वाहने अडवण्यात आली. दोन ते तीन तासांत एक किलोमीटरची रांग लागली. स्थानिक पोलिस प्रशासन कर्मचाऱ्यांना या घटनेची माहिती देण्यात आली. शेवटी आंदोलकांनी प्रादेशिक परिवहन विभागाला कळवून या जकात चुकवून जाणाऱ्या वाहनांवर कार्यवाही करण्यास सांगितले. मध्यरात्री २ वाजण्याच्या दरम्यान प्रादेशिक परिवहन विभाग अधिकारी कर्मचारी तिथे आले. त्यानंतर कासा पोलिस कर्मचाऱ्यांनी सर्व वाहनांना चारोटी नाक्यावर वजन करण्यास नेले. त्या वेळी चार वाहने ओव्हरलोड निघाली. या गडबडीत बऱ्याच वाहनचालकांनी नजर चुकवत आपली वाहने पळवून नेली.
---
अनेक अवजड वाहने या मार्गाने जात असतात. ओव्हरलोड वाहने भरधाव वेगाने जात असतात. एका वेळी दोन वाहने जात असताना बाजूला असणाऱ्या विजेच्या खांबांचे नुकसान करतात. अनेक वेळेस वीज तारा तुटून ग्रामस्थ विजेविना राहतात. वाहनांच्या मोठ्या रांगा लागून अनेक तास वाहतूक कोंडीदेखील होत आहे. दररोज या रस्त्यावर वाहने अपघातग्रस्त होत आहेत. या रस्त्यावर अनेक पोलिस चौक्या आहेत. तरीही ओव्हरलोड व जकात चुकवून वाहने कशी जात आहेत, असा प्रश्न विचारला जात आहे.