लसवंतांनाच मिळणार धान्य
जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश
पालघर, ता. ६ (बातमीदार) ः कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. ओमिक्रॉन विषाणूमुळे रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सरकारकडून कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहेत. त्यातच आता पालघर जिल्ह्यातील रास्त भाव दुकानदार धान्य व केरोसीन घेणाऱ्या व्यक्तींनी लशीचे दोन डोस घेणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांनी सांगितले आहे. लसवंतांनाच धान्य देताना प्राधान्य देण्यात यावे, अशा सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ यांनी दिल्या आहेत.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने गर्दीच्या ठिकाणी कडक निर्बंध लावले आहेत. पालघर जिल्ह्यातील रास्त भाव दुकान धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक, त्याचप्रमाणे दुकानातील व्यक्ती यांनीही लस घेणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले आहे. दोन डोस घेतलेल्या ग्राहकांना धान्य व केरोसीन वितरित करावे, त्यानंतरच लशीचा एक डोस घेतलेल्या ग्राहकांना प्राधान्य द्यावे, ज्या व्यक्तींनी लस घेतली नाही त्यांची यादी करून नजीकच्या आरोग्य केंद्रात द्यावी. संबंधित आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांनी अशा व्यक्तीच्या घरी जाऊन हर घर दस्तक योजनेची अंमलबजावणी करून संबंधित व्यक्तीचे लसीकरण केल्यानंतरच संबंधितांना धान्य मिळेल व कोणीही अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
...तर कारवाई होणार
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.