निर्जीव भिंती बोलक्या होणार
नव्या वर्षात रंगीत चित्रे व सुशोभीकरणावर महापालिका भर देणार
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ६ : महापालिकेतर्फे २०२१ च्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत शहरात केलेल्या सुशोभीकरणाचे विशेष कौतुक करण्यात आले. त्यामुळे पुढील वर्षीच्या स्पर्धेच्या अनुषंगाने शहरातील भिंती, उड्डाणपूल, अंडरपास यावरील रंगचित्रे, मुख्य चौकातील शिल्पाकृती, कारंजे अशा विविध गोष्टींचे सुशोभीकरण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. गेल्या वर्षी शहराचे रूप अधिक सुंदर झाल्याचे अभिप्राय नागरिकांप्रमाणेच शहराला भेटी देणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व प्रवाशांकडून देण्यात आले.
''स्वच्छ सर्वेक्षण २०२२''च्या अनुषंगाने सुशोभीकरण कामे करताना मागील वर्षी काढलेली व अजूनही चांगल्या स्थितीत असलेली भित्तिचित्रे पाण्याने स्वच्छ करून घ्यावीत. आवश्यक त्या दर्शनी ठिकाणी नवीन चित्रे काढावीत. त्यामध्ये नवी मुंबईतील प्रत्येक भागाला समाविष्ट करावे, असे निर्देश बांगर यांनी दिले. गेल्या वर्षी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी अभिनव चित्र संकल्पना राबविल्यामुळे शहराचे रूपच बदलून गेल्याचे नागरिकांना जाणवले.
भित्तिचित्रांमधून ''फ्लेमिंगो सिटी'' म्हणून नवी मुंबईची असलेली ओळख अधोरेखित व्हावी, याचे प्रभावी सादरीकरण करण्यात यावे, तसेच भित्तिचित्रांप्रमाणे मुख्य चौक, कॉर्नर, दुभाजक अशा दर्शनी ठिकाणी आकर्षक शिल्पाकृती उभाराव्यात व त्यातही ''थ्री आर'' संकल्पनेनुसार टाकाऊपासून टिकाऊ शिल्पाकृतींचा अंतर्भाव असावा, अशा सूचना आयुक्तांनी केल्या.
चौकट
फुटबॉल खेळाच्या चित्र व शिल्पांचा समावेश
जानेवारीत होणारी आशियाई फुटबॉल स्पर्धा व त्यानंतर ६ महिन्यांनी होणारी फिफा फुटबॉल स्पर्धा या अनुषंगाने सुशोभीकरणामध्ये फुटबॉल खेळाच्या चित्र व शिल्पांचा समावेश शहरातील मुख्य ठिकाणी सुशोभीकरणात केला जाणार आहे. याशिवाय शहरातील सर्व भागात प्रमुख ठिकाणी विविध प्रकारची कारंजी बसविण्यात यावी, असे सूचित करतानाच ती कारंजी नियमित सुरू राहतील, याची काटेकोर काळजी घेण्याचेही निर्देशित करण्यात आले. कारंज्यांमध्ये प्रक्रियाकृत पाणी वापरण्याच्या नवी मुंबई महापालिकेच्या कार्यपद्धतीची नोंद स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली.
महामार्ग व हार्बर मार्गावरील प्रवाशांचे लक्ष वेधणार
विशेषत्वाने सायन-पनवेल महामार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असून त्या ठिकाणची सुशोभीकरण कामे अधिक कल्पकतेने करावीत. तसेच प्रवाशांना आपण नवी मुंबई शहरातून प्रवास करत आहोत, असा फरक जाणवावा, अशा प्रकारे कामे करण्याच्या सूचना आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिल्या. अशाच प्रकारे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या लक्षात घेऊन रेल्वे रुळांच्या दोन्ही बाजूच्या दर्शनी भिंती चित्रांकित करून सुशोभित कराव्यात, असेही निर्देश बांगर यांनी दिले.
कोट
सुशोभीकरणाचा सकारात्मक परिणाम नागरिकांच्या मानसिकतेवर होऊन शहर स्वच्छतेला पूरक वातावरणनिर्मिती होते. तसेच पारितोषिक स्वरूपात त्याची नोंदही घेतली जाते, हे लक्षात घेत ''स्वच्छ सर्वेक्षण २०२२'' ला सामोरे जाताना या कामांना गती देण्यात येणार आहे.
- अभिजीत बांगर, महापालिका आयुक्त.