लक्षणे असल्यास कोरोना चाचणी करा
केडीएमसी आयुक्तांचे नागरिकांना न घाबरण्याचे आवाहन
कल्याण, ता. ६ (बातमीदार)ः ताप, सर्दी, खोकला ही लक्षणे असल्यास त्वरित कोरोना चाचणी करा, असे आवाहन केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचेही ते म्हणाले.
केडीएमसी हद्दीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवशी यांनी मागील तीन दिवसांपासून तज्ज्ञ डॉक्टरांच्या ऑनलार्इन बैठका घेतल्या. त्याची माहिती देण्यासाठी आज (गुरुवार ता. ६) पत्रकार परिषदेमध्ये पालिका आयुक्त यांनी सांगितले, की रुग्णसंख्या वाढत असल्याचे खरे असले, तरी आमची यंत्रणा सज्ज आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस पूर्ण करावेत. तसेच ताप, सर्दी, खोकला ही लक्षणे असल्यास त्वरित चाचणी करावी. घाबरून जाण्याची गरज नाही, घरी राहूनही उपचार घेऊ शकता. घरात जागा नसेल त्यांनाच पालिकेच्या कोविड केंद्रात उपचार घेण्याचा सल्ला देत आहोत, असे आयुक्तांनी सांगितले.
या वेळी गरोदर महिला आणि लहान मुलांमध्ये कोरोनाचे प्रमाण जास्त असले तरी नागरिकांनी घाबरून न जाता चाचणी करून उपचार घ्यावेत. गरोदर महिला व लहान मुले आणि अन्य कोरोनाबाधित रुग्णांची धावपळ होणार नाही याची काळजी डॉक्टर वर्गाने घ्यावी. केडीएमसी हद्दीत १५ ते १८ वयोगटातील जवळपास ४० हजार मुलांनी पहिला डोस घेतला असून येणाऱ्या आठवड्यात पूर्ण लसीकरण केले जाईल, असा दावा पालिका आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी केला.