ओमिक्रॉन सौम्य तरी फैलाव का?
डॉक्टरांना चिंता औषधांच्या किमतीची
सकाळ न्यूज नेटवर्क
मुंबई, ता. ६ ः कोरोनासंसर्ग प्रचंड गतीचे कारण काय या प्रश्नाने डॉक्टर आणि शास्त्रज्ञ मंडळींना बुचकळ्यात टाकले आहे. ओमीक्रॉन हा त्रासदायक प्रकार नसून तो डेल्टापेक्षा कमालीचा सौम्य आहे. मात्र, ज्या गतीने हा फैलाव होतो आहे, त्यामागची कारणे समजून घेणे आवश्यक मानले जाते आहे. जगभरात यासंबंधात विचार सुरू असताना इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेने तज्ञांची समिती नेमली आहे. ही समिती उपाययोजना, कारणमीमांसा याबद्दल एकत्रित चर्चा करीत आहे.
कोरोनावरील उपचारांसाठी सर्व डॉक्टर आवश्यक ती मदत करतील, असे आश्वासन देतानाच असोसिएशनने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र पाठवले आहे. कोविडवर उपाययोजना करणारी औषधे सर्वत्र उपलब्ध असावीत, याकडे लक्ष देण्याची विनंती पत्राव्दारे करण्यात आली. हातमोजे, मास्क यांची कमतरता भासू नये याची शासनाने सोय करावी, अशी विनंती करतानाच काही ठिकाणी साठेबाज अयोग्य वागत असल्याचेही मत संघटनेने व्यक्त केले.
काही ठिकाणी सहज उपलब्ध असणाऱ्या औषधांच्या किमती वाढल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे. ‘आयएमए’चे अध्यक्ष सुहास पिंगळे आणि सचिव मंगेश पाटे यांनी यासंबंधात आरोग्यखात्याशी पत्रव्यवहार सुरु केला आहे.
मोलनुपिरावीर वापर योग्य ?
केवळ ३५ ते ४० रुपयांच्या किमतीत मोलनुपिरावीर या औषधाने कोरोना दूर पळतो आहे. अगदी मृत्यूच्या दाढेतूनही हे औषध रुग्णाला बाहेर आणत असल्याची चर्चा आहे. कमी किमतीत पाच दिवसांत कोरोना पळवून लावणाऱ्या या औषधाला ‘आयसीएमआर’ने अद्याप परवानगी दिली नसल्याचे आरोग्य शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी नमूद केले. मात्र, हे औषध वापरणे कायदेशीर असल्याचे सांगत तज्ज्ञ डॉ. अविनाश भोंडवे यांनी वैद्यकीय सल्ल्याने हे औषध वापरावे असे मत दिले.
गर्भवती महिला, अल्पवयीन मुले वगळता अन्य कुणीही वैद्यकीय सल्ल्यानुसार हे औषध घ्यावे, असेही ते म्हणाले. ४ ते ५ दिवसांत या औषधाने गुण येतो, असेही ते म्हणाले.
...