वरळीत प्रकल्पग्रस्तांसाठी ४५० घरे
पालिका करणार १७५ कोटी खर्च
प्रकल्पग्रस्तांसाठी घरे उभारण्यासाठी मुंबई महापालिकेने स्वत:च प्रयत्न सुरू केले आहेत. पवई, चांदिवली, दहिसरपाठोपाठ आता वरळीतही प्रकल्पग्रस्तांसाठी घरे उभारण्यात येणार आहेत. तब्बल ४५० घरे उभारण्यासाठी महापालिका १७५ कोटी रुपयांचा खर्च करणार आहे.
मुंबईतील विविध प्रकल्पांच्या आड येणाऱ्या कुटुंबांचे पुनर्वसन करण्यासाठी महापालिकेकडून पर्यायी घरे दिली जातात. मात्र, ही घरे शहराच्या कोपऱ्यात असल्याने प्रकल्पग्रस्त स्थालांतरित होण्यास नकार देतात. त्यामुळे प्रकल्पही रखडून खर्चात वाढ होते. येत्या काळात महापालिकेला ३६ हजार घरांची आवश्यकता आहे; तर आतापर्यंत २४ हजार ४९६ घरे महापालिकेने वितरित केली आहेत.
प्रकल्पग्रस्तांनी स्थलांतर करावे म्हणून मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी घरे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जमीनमालकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यात, चांदिवली आणि दहिसर येथे घरे उभारण्यात येणार आहेत. वरळी येथील गोमाता नगर परिसरात ४५० घरे उभारण्यासाठी महापालिकेने निविदा मागवल्या आहेत. प्रत्येकी ३०० चौरस फुटाच्या घरांसाठी पालिकेने १७५ कोटी रुपयांचा खर्च अंदाजित केला आहे.
----
१५ महिन्यांत काम पूर्ण
प्रकल्पग्रस्तांची घरे जलदगतीने बांधायची असल्याने ‘अल्ट्रा हाय परफॉर्मन्स काँक्रीट’चा (यूएचपीसी) वापर करण्यात येणार आहे. वरळीतील गणपतराव कदम मार्गावर पालिकेने संक्रमण शिबिर बांधले होते. आता हे संक्रमण शिबिर धोकादायक ठरल्याने तेथे प्रकल्पग्रस्तांची घरे उभारण्यासाठी आरक्षण करण्यात आले आहे. या भूखंडावर पालिका ही घरे उभारणार आहे. या कामासाठी वापरले जाणारे ‘यूएचपीसी’ हे उच्च दर्जाचे काँक्रीट असून कामाचे आदेश दिल्यानंतर १५ महिन्यांत प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे,’ असे पालिकेतर्फे सांगण्यात आले.
माहुलमुळे कोंडी
महापालिकेच्या प्रकल्पातील बाधित कुटुंबांची संख्या ३६ हजार २२१ आहे; तर चेंबूर परिसरात पालिकेला मालमत्तांच्या दुरुस्तीनंतर ८१९ घरे आणि इतर ठिकाणी १३१ घरे उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर माहुल येथील एव्हरस्माईल लेआऊटमधील ३ हजार ८२८ घरे मिळणार आहेत. मात्र माहुलमधील प्रदूषणामुळे नागरिक तेथे राहण्यास तयार नसल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार या घरांचे वाटप करता येत नाही. त्यामुळे पालिकेची कोंडी झाली आहे.