अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी मुलाखत
-----
दिवसाला ४० हजार रुग्ण आले तरी प्रशासन सज्ज!
किंवा
प्रशासन सज्ज; पण नियमही पाळायलाच हवेत!
इंट्रो
कोविडची तिसरी लाट आता उसळली आहे. बाधितांची रोजची संख्या २० हजारांवर पोहचली आहे. अशा परिस्थितीत बदललेल्या वातावरणामुळे ताप आणि सर्दी-खोकल्याचे रुग्णही वाढू लागले आहेत. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात कोविडची तिसरी लाट शिखरावर असेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी मुंबईकरांना दिलासा दिला असला तरी नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. ‘कोरोनाचे रोज ४० हजार रुग्ण आढळले तरी महापालिकेचे सर्व व्यवस्थापन झालेले आहे’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांच्याशी साधलेला संवाद.
समीर सुर्वे
--------
कोविडचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. पालिकेने त्या दृष्टीने काय तयारी केली आहे?
कोविडची रोजची रुग्णसंख्या २० हजारांवर पोहचली आहे. रुग्ण वाढत आहेत. महापालिका प्रशासनाने सर्व वैद्यकीय तयारी केली आहे. सध्या ३५ हजार बेड तयार आहेत. रुग्ण वाढल्यास त्यांची क्षमताही वाढवण्यात येईल. आता रुग्णांची संख्या २० हजारांवर स्थिरावली आहे. ती कमी झाली तर चांगली गोष्ट आहे; पण वाढली तरी पालिका सर्व तयारीनिशी सज्ज आहे. रुग्णव्यवस्थेचा वेळोवेळी आढावा घेतला जात आहे. चाचण्यांचे प्रमाणही वाढवले जात आहे. स्क्रिनिंग, विलगीकरण आणि चाचण्यांवर भर दिला जात आहे.
रुग्णसंख्या कितीही वाढली तरी पालिकेची तयारी आहे?
सध्या आढळणाऱ्या रोजच्या रुग्णांमध्ये किती जणांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे किंवा कोणाला प्राणवायूची गरज लागत आहे याचा आढावा घेतला जात आहे. त्यानुसार सर्व नियोजन करण्यात आले आहे. रोज ३५ ते ४० हजार रुग्ण सापडले तरी त्याचे नियोजन करता येऊ शकते. आता ३५ हजार बेड आहेत. गरज पडल्यास त्यांची संख्या एक लाखापर्यंतही वाढवता येऊ शकते. त्यात विलगीकरणासह सौम्य लक्षण असलेल्या बाधितांचीही व्यवस्था असेल. ४० हजार बेड विलगीकरणासाठी असतील. ३० हजार बेड सौम्य लक्षण असलेल्यांसाठी असतील. इतर बेड लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी असतील.
औषधे, इंजेक्शन आणि प्राणवायूचे काय?
औषधे आणि इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध आहेत. त्यांची वेळोवेळी खरेदी केली जाते. नियमित आढावाही घेतला जातो. राज्याच्या टास्क फोर्सने काही औषधे सुचवली आहेत. त्यानुसारही नियोजन केले जात आहे. रेमडेसिवीर आणि कॉकटेल औषधांचे नियोजन करण्यात आले आहे. रेमडेसिवीरचा साठा आहे. त्याचबरोबर कृत्रिम प्राणवायूचे नियोजन करण्यात येत आहे. नियमित आढावा घेतला जात आहे. आवश्यकतेप्रमाणे सर्व व्यवस्था केली जात आहे.
वस्त्यांमध्ये काय नियोजन आहे?
वस्त्यांमध्ये स्क्रिनिंग सुरू केले आहे. टप्प्याटप्प्याने सर्व परिसरात शोध घेतला जात आहे. संशयित रुग्ण आढळल्यास त्यांची चाचणी आणि विलगीकरण केले जात आहे. प्रत्येक प्रभागात एक किंवा दोन विलगीकरण केंद्रे तयार करण्याच्या सूचना प्रभाग पातळीवर केल्या गेल्या आहेत.
ताप, सर्दी आणि खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत. त्या दृष्टीने काय तयारी?
ताप, सर्दी आणि खोकल्याच्या रुग्णांसाठी फिवर क्लिनिक सुरू करण्यात आली आहेत. २०० दवाखान्यांमध्ये त्यांचे कॅम्प आहेत. ज्या भागात कॅम्प लावण्यासाठी जागा असेल तिथेही क्लिनिक सुरू केले जात आहे. नागरिकांवर तिथे उपचार केले जातील. त्यांच्या लक्षणांनुसार कोविडसह इतर आवश्यक चाचण्याही केल्या जातील. त्यामुळे फक्त कोविडच नाही, तर इतर संसर्ग आजारांचे रुग्णही आढळण्याची शक्यता आहे. जेणेकरून त्यांच्यावरही उपचार करता येऊ शकतील.
नागरिकांनी आता काय करण्याची गरज आहे?
नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोर पालन करणे फारच गरजेचे आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे, वैयक्तिक स्वच्छता आणि सुरक्षित अंतर पाळलेच पाहिजे. ताप, सर्दी वा खोकला अंगावर न काढता तत्काळ वैद्यकीय सल्ला घेतला पाहिजे. चाचणी करून घ्यायला हवी. बाधितांनी आणि त्यांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींनीही नियम पाळणे गरजेचे आहे. महापालिकेच्या वॉर रूमच्या हेल्पलाईन कार्यरत आहेत. त्यावर आवश्यक सहकार्य केले जाते.
आता मिनी लॉकडाऊन लागू आहे...
अगदीच मिनी लॉकडाऊन म्हणता येणार नाही. पूर्वीचेच नियम आहेत. फक्त वेळेत बदल केला आहे. त्यामुळे लॉकडाऊन वा मिनी लॉकडाऊन अशी परिस्थिती नाही.
...पण नियमांच्या अंमलबजावणीचे काय?
नियमांची अंमलबजावणी होते का नाही, हे तपासण्यासाठी प्रत्येक प्रभागात पालिकेची दोन पथके आहेत. त्यांच्यामार्फत लक्ष ठेवले जात आहे. हॉटेल आणि उपाहारगृहासह इतर काही आस्थापनांना त्यांची क्षमता जाहीर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार तपासणी केली जात आहे.
--------
कोट
सध्या मिनी लॉकडाऊन नाही. फक्त वेळेत बदल करण्यात आला आहे. महापालिकेने नियोजन केले आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे. स्क्रिनिंग, चाचणी आणि विलगीकरणावर भर दिला जात आहे. औषधे आणि प्राणवायूचा साठा आहे. चाचण्याची संख्याही वाढवण्यात आली आहे.
- सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका.