मुंबईमध्येच ५७ टक्के सक्रिय रुग्ण
मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि पुणे जिल्ह्यांतच ९२ टक्के बाधित
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : काही दिवसांपासून मुंबईसह राज्यभरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. सध्या बाधितांच्या संख्येत काही प्रमाणात घट होत असली, तरी एकट्या मुंबईमध्येच ५७ टक्के सक्रिय रुग्ण आहेत. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि पुणे अशा पाच जिल्ह्यांमध्येच ९२ टक्क्यांहून अधिक सक्रिय कोविड रुग्णांची नोंद झाली आहे. येथील संसर्ग रोखण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
मुंबईनंतर ठाणे, पालघर, रायगड आणि पुणे अशा चार जिल्ह्यांमध्ये ३४.५२ टक्के सक्रिय रुग्ण आहेत. राज्यातील दोन लाख सहा हजार बाधितांपैकी ६९ हजार ८२९ सक्रिय रुग्ण या चार राज्यांत आहे. मुंबई आर्थिक राजधानी आहे. दररोज हजारो नागरिक शहरातून प्रवास करतात. त्यामुळे मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या जास्त आहे. आंतरराज्य सीमा खुल्या असल्याने मुंबईतून शेजारच्या जिल्ह्यांमध्ये विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता असल्याने राज्यातील सर्व पात्र व्यक्तींचे लसीकरण करण्यावर भर देत आहोत, असे राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले.
१ जानेवारी रोजी राज्यातील ३२,२२५ सक्रिय रुग्णांमध्ये मुंबईतील २२,३३४ जण (७० टक्के) होते. मुंबईव्यतिरिक्त ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये सक्रिय प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पुण्यात जवळपास एक हजार टक्के रुग्ण वाढले आहेत. त्याच कालावधीत ठाण्यातील सक्रिय रुग्णांची संख्या १,०७७ वरून ३८,१०५ वर पोहोचली आहे. आदिवासीबहुल भाग पालघरमध्ये १० डिसेंबर २०२१ रोजी सक्रिय रुग्णांची संख्या १९९ होती. ९ जानेवारी रोजी ती ६,३८१ वर पोहोचली. रायगडमध्ये याच कालावधीत सक्रिय रुग्णांची संख्या १७० वरून ६,४८६ वर पोहोचली आहे. पुणे जिल्ह्यात गेल्या एका महिन्यात १,७१५ वरून ही संख्या १८,८५७ पर्यंत पोहोचली आहे.
ग्रामीण भागातही संसर्गात वाढ
मागील दोन लाटांप्रमाणेच कोरोना संसर्ग पुन्हा राज्याच्या ग्रामीण भागातही पसरू लागला आहे. १० डिसेंबर रोजी भंडाऱ्यामध्ये शून्य सक्रिय कोविड रुग्ण होते; परंतु आता तिथे १० रुग्ण आहेत. अमरावतीमध्ये नऊ सक्रिय रुग्ण होते. ते आता वाढून २८८ पर्यंत पोहोचले आहेत. याच कालावधीत नागपूर जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या ८६ वरून २,६०९ झाली आहे.