वसईत चोरी करणारी
गँग नेपाळच्या सीमेवर अटक
माणिकपूर गुन्हे प्रकटीकरण पथकाची कारवाई
नालासोपारा, ता. १३ (बातमीदार) : वसईमध्ये सोसायटी, हॉटेल, कंपनीमध्ये काम करत त्या ठिकाणी रेकी करून चोरी करणाऱ्या नेपाळी गँगचा माणिकपूर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने भांडाफोड केला. या टोळीमधील तिघांना पळून जात असतानाच नेपाळ सीमेवर अटक करण्यात आली. बुधवारी त्यांना वसईत आणण्यात आले असून न्यायालयाने त्यांना २० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
धरमराज दयाराम ढकाल ऊर्फ शर्मा, राजेश पदम जोशी ऊर्फ तप्तराज पदमराज देवेकोटा, अर्जुन ऊर्फ नरेश धरमराज ढकाल अशी अटक केलेल्या नेपाळी गॅंगमधील सराईत चोरट्यांची नावे आहेत. ७ जानेवारीला वसईच्या सनसिटी परिसरात रात्रीच्या वेळी घरफोडी झाली होती. याप्रकरणी माणिकपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक बाबींच्या आधारे माणिकपूर पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रभारी पोलिस निरीक्षक अभिजित मडके, सपोनि सचिन सानप आणि पीएसआय हिणी डोके यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाची नियुक्ती केली. यातील आरोपी नेपाळच्या दिशेला रवाना झाले असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. या पथकाने उत्तर प्रदेश आणि नेपाळ सीमेवरील रूपईडिहा चेकपोस्टवर सापळा लावून तपासणी केली. १० जानेवारीला तीन आरोपींना मुद्देमालासह रंगेहाथ अटक कली. त्यांना लखनौच्या बहारिष येथील न्यायालयात हजर करून बुधवारी (ता. १२) वसईत आणले. वसई न्यायालयाने २० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती माणिकपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भाऊसाहेब आहेर यांनी दिली.
चौकट
सव्वापाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत
या आरोपींकडून घरफोडीतील १२४ ग्रॅमचे दागिने, सहा हजार ८०० रोख रक्कम, तीन मोबाईल फोन असा पाच लाख २४ हजार ४८० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही गॅंग सोसायटी, कंपनी व अन्य ठिकाणी सुरक्षा रक्षक, तसेच हॉटेलमध्ये वेटरचे काम करून त्या परिसराची सर्व माहिती काढून संधी मिळताच आपल्या सहकार्यांमार्फत घरफोडी करून नेपाळला फरार होत होती.