महाराष्ट्र, एटीएसची प्रतिमा
मलीन करण्याचा प्रयत्न!
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावरून नसीम खान यांचा आरोप
मुंबई, ता. १४ : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएमार्फत एटीएस व राज्य सरकारची प्रतिमा मलीन करून तिचा फायदा उत्तर प्रदेशातील निवडणुकीत घेण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे एटीएसच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयीन सुनावणीत हजर राहावे, अशी मागणी राज्य प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी केली आहे.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील एनआयएची भूमिका संशयास्पद असून ती यंत्रणा केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर हे प्रकरण कमकुवत करू पाहत असल्याचे दिसते. एटीएस व राज्य सरकारची प्रतिमा मलीन करून त्याचा फायदा उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत व्हावा, यासाठी एटीएस हिंदूविरोधी असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे, परंतु मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी दोषींना कडक शासन होणे गरजेचे आहे. त्यामुळे सुनावणीवेळी एटीएसच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित असणे गरजेचे आहे, अशी मागणी नसीम खान यांनी केली आहे.
नसीम खान यांनी गुरुवारी (ता. १३) एटीएस प्रमुखांची भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन दिले. तत्कालीन एटीएसप्रमुख हेमंत करकरे यांनी २००८ मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करून प्रज्ञा ठाकूर, कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांना अटक केली. हे प्रकरण एनआयएकडे दिल्यानंतर प्रज्ञा ठाकूर यांच्यावरील मकोका हटवण्यात आला व त्यांची निर्दोष सुटका व्हावी यासाठी खटाटोप सुरू झाला. या प्रकरणात २२३ साक्षीदार असून त्यातील १६ जणांनी साक्ष फिरवली आहे. १०० साक्षीदारांच्या साक्षी अजून नोंदवल्या गेलेल्या नाहीत. या साक्षीदारांना संरक्षण देणे गरजेचे आहे. आरोपींच्या दबावाखाली येत साक्षीदार साक्ष फिरवत असल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीत याचा फायदा व्हावा, यासाठी राज्य सरकार व एटीएसची प्रतिमा खराब करण्याचे काम केले जात असल्याचे खान यांचे म्हणणे आहे.
एनआयची भूमिका संशयास्पद!
आरोपींना दिलासा मिळालेल्या कोणत्याच निर्णयाला एनआयएने उच्च न्यायालयात आव्हान दिलेले नाही, यातून एनआयची भूमिका संशयास्पद वाटते. एटीएसने साक्षीसाठी छळ केल्याचे काही साक्षीदारांनी म्हटले आहे. हे साक्षीदार राज्य सरकार व एटीएसची प्रतिमा मलीन करत आहेत, असे नसीम खान यांनी म्हटले आहे.