शिक्षिका दालनाने अध्यापनाचा मार्ग सुकर
अंबरनाथमधील गांधी शाळेला माजी विद्यार्थ्यांकडून भेट
अंबरनाथ, ता. १५ (बातमीदार) : शाळेतील अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सहज व्हावी, विद्यार्थ्यांना धडे देण्यापूर्वी अध्ययनाची पूर्वतयारी करता यावी, तसेच अध्यापन साहित्य सुरक्षित ठेवता यावे यासाठी अंबरनाथच्या महात्मा गांधी विद्यालयात अनोखे शिक्षिका दालन सुरू करण्यात आले आहे. सुमारे ४६ वर्षांपूर्वीच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील महिला शिक्षिकांसाठी शिक्षिका दालनाची महत्त्वपूर्ण भेट देऊन अनोखी गुरुदक्षिणा दिली आहे.
अंबरनाथ येथील दि एज्युकेशन सोसायटीच्या महात्मा गांधी विद्यालयातील १९७६ च्या दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी सुमारे तीन लाख रुपये इतका निधी संकलित करून त्यातूनच हे शिक्षिका दालन साकारले आहे. या दालनाचे उद्घाटन गुरुवारी (ता. १३) माजी विद्यार्थी अभियंता आणि आरसीसी सल्लागार प्रमोद कांबळे यांच्या हस्ते झाले. मागील महिन्यात १९७७ च्या दहावीच्या वर्गातील माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी गणिताची प्रयोगशाळेची भेट दिली होती. माजी विद्यार्थी स्मिता शेवडे, विकास भोसेकर, मंगला सांबरे, अनिल लांबे आदी माजी विद्यार्थी आणि शाळेच्या माजी मुख्याध्यापिका सुमेधा अभ्यंकर, संस्थेचे कार्यवाह सुधींद्र शूरपाली आदी या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते.
माजी विद्यार्थी स्मिता शेवडे यांनी शालेय जीवनातील जुन्या आठवणींना यावेळी उजाळा दिला. पुन्हा शाळेचे दिवस आठवले, याच शाळेने अभ्यास आणि संस्कार शिकवले, घडवले. याचे सारे श्रेय त्यांनी शाळेला दिले. यापुढील काळात शाळेला नेहमी सहकार्य करण्यात येईल, असे प्रमोद कांबळे यांनी सांगितले. संस्थेचे कार्यवाह सुधींद्र शूरपाली यांनी शाळेत आगामी काळातील विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा शेळके, मुख्याध्यापक डॉ. बाळासाहेब गायकवाड यांनी प्रास्ताविक, तर उप मुख्याध्यापिका सुप्रिया गोसावी यांनी आभार मानले.
अल्प कालावधीत साकारले दालन
शिक्षिकांसाठी शाळेत स्वतंत्र जागा असावी, या हेतूने या शिक्षिका दालनाची निर्मिती करण्यात आली आहे. शाळेतून १९७६ मध्ये दहावीची परीक्षा देऊन बाहेर पडलेले विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन विविध क्षेत्रांत स्थिरावले आहेत. शाळेमध्ये अभ्यासाबरोबरच संस्काराचे धडे मिळाले, त्याचा प्रत्येकाला फायदा झाला. माजी विद्यार्थ्यांच्या `मैत्रांगण` ग्रुपवरून एकमेकांच्या सुख-दुःखाच्या चर्चा होऊ लागल्या. त्याच वेळी आपण शिकलेल्या शाळेमध्ये शिक्षिका दालनाची गरज असल्याचे विद्यार्थ्यांना समजले आणि १९७६ च्या वर्गामधील माजी विद्यार्थ्यांनी ही जबाबदारी उचलली आणि अवघ्या दोन महिन्यांच्या अल्पशा कालावधीत दालन साकारले आहे.
सध्याचे शैक्षणिक धोरण आणि कोरोना काळामुळे शाळा चालवताना असंख्य समस्यांना सामोरे जावे लागते. संस्थेचा विकास माजी विद्यार्थ्यांमुळे होत आहे ही आनंदाची बाब आहे. शाळेसाठी लागणाऱ्या अजूनही खूप गरजा आहेत. माजी विद्यार्थ्यांच्या मिळणाऱ्या पाठबळामुळे दिलासा मिळतो.
- धनंजय जठार, माजी मुख्याध्यापक.