महिलांसाठी टोल फ्री क्रमांक होणार सुरू
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा २९ वा वर्धापन दिन २५ जानेवारीला
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : राज्यभरातील महिलांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराच्या घटनांबाबत महिलांना तक्रार नोंदवता यावी, महिलांना कायदेशीर सल्ला उपलब्ध व्हावा यासाठी राज्य महिला आयोगाकडून टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात येणार आहे. या हेल्पलाईनचे अनावरण आयोगाच्या वर्धापनदिनी करण्यात येणार आहे.
कौटुंबिक अत्याचार, कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक शोषणाचा बळी पडणाऱ्या आणि त्यामुळे नैराश्यग्रस्त झालेल्या महिलांच्या मदत आणि मार्गदर्शनासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची ‘सुहिता’ नावाची समुपदेशन हेल्पलाईन यापूर्वी अस्तित्वात होती. मात्र या हेल्पलाईनचा क्रमांक अधिक आकड्यांचा असल्याने महिलांना आयोगाकडे संपर्क साधण्यास अडचण येत होती. त्यामुळे आयोगाने चार ते पाच आकड्यांचा हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य महिला आयोगाच्या स्थापनेला २५ जानेवारीला २९ वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने यशवंतराव चव्हाण केंद्रातील रंगस्वर सभागृहात वर्धापनदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत. यासोबत महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, महिला आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष ज्योती ठाकरे, पोलिस महासंचालक संजय पांडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यासोबत प्रियांका सावंत, निर्मला सावंत-प्रभावळकर, विजया रहाटकर, सुशिबेन शाह या महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत. या कार्यक्रमात राज्यभरातील महिलांसाठी टोल फ्री क्रमांकाचे अनावरण करण्यात येणार आहे. सोबतच महिला आयोगाने तयार केलेल्या कॅलेंडर व डायरीचे देखील अनावरण या दिवशी होणार आहे. हा कार्यक्रम सोहळा कोरोनाचे सर्व निर्बंध पाळून ४५ लोकांच्या उपस्थितीत पार पडणार असल्याचे, आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले.