ओल्या काजूगरांसाठी मार्चची प्रतीक्षा
बदलत्या वातावरणामुळे मोहर लांबणीवर
अजित शेडगे : सकाळ वृत्तसेवा
माणगाव, ता. २४ : रायगड जिल्ह्यात पडणारा अवकाळी पाऊस आणि हवामानात सातत्याने होणाऱ्या बदलांमुळे यंदा बहुसंख्य पिकांना फटका बसला आहे. ओल्या काजूगरांचा हंगाम तर मार्चपर्यंत लांबणीवर पडणार आहे. उत्पादनातही घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येते.
गेल्या वर्षी लांबलेल्या पावसाळ्यासह कोरोनामुळे काजू उत्पादकांचे मोठे नुकसान झाले होते. या वर्षीही पाऊस नोव्हेंबरपर्यंत लांबला. त्यामुळेच मोहोर हंगाम लांबला आहे. दोन दिवसांपासून बदललेल्या हवामानामुळे मोहोर प्रक्रिया आणखी बाधित होण्याची शक्यता वर्तविण्यात येते.
साधारणतः फेब्रुवारीत ओले काजूगर विक्रीसाठी बाजारात आणले जातात. यातून अनेक शेतकरी, आदिवासी महिलांना हक्काचा रोजगार उपलब्ध होतो. मात्र या वर्षी लांबलेल्या पावसामुळे हा हंगाम लांबला. खवय्यांना काजूगरांसाठी मार्चपर्यंत थांबावे लागणार असून १०० ओल्या काजूगरांसाठी १२५ पेक्षा अधिक रुपये मोजावे लागतील.
......................
वारंवार पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे काजू पिकाचे संकट उभे राहिले आहे. बदलत्या हवामानामुळे मोहोराचे नुकसान झाले आहे. आता मोहोर प्रक्रिया सुरू झाली असताना दोन दिवसांपासून बदललेल्या हवामानामुळे फळधारणा धोक्यात आली.
- योगेश पतारे, शेतकरी, माणगाव.
...
काजू मोहोर प्रक्रिया सुरू झाली आहे. बोंड तयार होण्यास अवधी आहे. मात्र वारंवार हवामानात बदल होत आहेत. अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे फळ प्रक्रियेवर परिणाम होणार आहे.
- यतीन करडे, काजू उत्पादक शेतकरी, म्हसळा.
.....
अवकाळी पावसामुळे या वर्षी ओल्या काजूगरांसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरवषी फेब्रुवारी, मार्च महिन्यात काजूगरांची चव चाखायला मिळते. या वर्षी मार्चनंतरच काजूगर मिळणार आहेत.
- सतीश महाबळे, रोहा.
...
ओल्या काजूगरांच्या भावावर दृष्टिक्षेप
वर्ष शेकडा भाव (रुपयांत)
२०२०- १००
२०२१- १०० ते १२०
२०२२ -१२५ (संभाव्य)
.....