कोरोनामुळे एनएनएमटीला आर्थिक फटका
दिवसाला नऊ ते १० लाखांचे नुकसान; प्रवासी घटल्याने बसफेऱ्या कमी
वाशी, ता. ३१ (बातमीदार) ः शहरावरील कोरोनाचे सावट कमी होत असून रुग्णसंख्या वाढीचा आलेखही उतरणीला लागला आहे. त्यामुळे अनेक निर्बंध शिथिल होऊन शहर पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र असे असूनही एनएमएमटी बसमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या अजूनही कमीच आहे. त्याचा परिणाम एनएमएमटीच्या तिजोरीवर होत आहे. बहुतांश मार्गांवर प्रवासी संख्या कमी असल्याने बसही मर्यादित वेळेत चालवल्या जातात. त्यामुळे एनएमएमटीला दिवसाला नऊ ते १० लाखांचे नुकसान सहन करावे लागत आहे. जो पर्यंत सर्व बस रस्त्यावर उतरणार नाहीत, तोपर्यंत परिवहनच्या तिजोरीवर हा भार कायम राहणार आहे.
परिवहनच्या ताफ्यात ५५० बस आहेत, यापैकी सध्या केवळ ३३३ बस रस्त्यावर चालवल्या जात आहेत. परिणामी सरासरी २०० बस आगारातच उभ्या आहेत. कोरोना काळापासून अनेक प्रवासीमार्ग बंद करण्यात आले होते. हळूहळू हे मार्ग सुरू करण्यात आले. मात्र अनेक मार्गांवर अजूनही प्रवासी संख्या वाढत नसल्याची परिस्थिती आहे. यात जवळच्या मार्गांचा अधिक समावेश आहे. पूर्वी जवळच्या ठिकाणी जाण्यासाठी एनएमएमटीच्या बसचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असे. कमी प्रवासी भाडे, दहा ते पंधरा मिनिटांनी बसफेऱ्या अशा सुविधा असल्याने प्रवाशांची पसंती एनएमएमटीला होती. मात्र कोरोनाकाळापासून हे चित्र पालटले आहे. अनेक मार्गांवरील बस बंद करण्यात आल्या, मात्र आता हळूहळू अनेक मार्गांवरील बस सुरू केल्या जात आहेत. तरी प्रवाशांचा हवा तसा प्रतिसाद मिळत नाही.
कोरोनामुळे अनेक प्रवासी स्वत:च्याच वाहनांचा किंवा ओला-उबेरसारख्या प्रवासी सेवेचा पर्याय निवडत आहेत. त्यामुळे एनएमएमटीचे प्रवासी घटले आहेत. पूर्वी एनएमएमटीचे दररोजचे उत्पन्न ३८ ते ३९ लाखांवर होते, ते आता २८ ते २९ लाखांवरच आहे. अनेक प्रवासी मार्ग अजूनही बंद आहेत. काही मार्ग केवळ नावापुरते सुरू आहेत. बसमधून प्रवास करणाऱ्यांची रोडावलेली संख्या यासाठी कारणीभूत आहे. अनेक कार्यालयांची अजूनही घरातूनच कामे सुरू आहेत. त्यामुळे दररोज कामासाठी जाणाऱ्यांची संख्या कमी आहे. याचाही फटका बससेवेला बसत आहे. तसेच बसनमधील गर्दीमुळे संसर्गाचा धोका असल्याने अनेकांना हा प्रवास असुरक्षित वाटतो. त्यामुळे बसमधून प्रवास करणे टाळून रिक्षा, टॅक्सीचा पर्याय स्वीकारला जात आहे.
चौकट
एसटी संप पथ्यावर
एसटीचा संप सुरू झाल्यापासून एनएमएमटीने एसटीच्या मार्गावर काही नवीन मार्ग सुरू केले आहेत. या मार्गांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यात खोपोली, कर्जत, रसायनी या नवीन मार्गांचा समावेश आहे. या मार्गांवर ४५ रुपये प्रति किलोमीटर या दराने उत्पन्न मिळत आहे. एनएमएमटीचे भाडेही कमी असल्याने प्रवाशांचीही पसंती मिळत आहे. तसेच उरण मार्गावर चालवल्या जाणाऱ्या बसमधूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. लांबपल्ल्याचे मार्ग फायद्याचे ठरले आहेत. मात्र त्यातून इतर मार्गांवरील तोटा भरून निघणारा नाही.
बससंख्या -
ताफ्यात ५५०
रस्त्यावर ३३३
दररोजचे उत्पन्न -
पूर्वी ३८ ते ३९
आता २८ ते २९