उत्तर प्रदेशात निवडणुकीत भाजपला मातीत संपवून टाका
मुंब्य्रात जितेंद्र आव्हाड यांचे खुले आवाहन
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३१ : २०२४ मध्ये दिल्लीत सत्तेत कोण बसणार, हे उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या निकालावर स्पष्ट होणार आहे. त्यामुळे ही निवडणूक जिंकण्यासाठी अनेक लोक उत्तर प्रदेशात तळ ठोकून आहेत. फूट पाडण्याचा त्यांचा प्रयत्न असेल, पण तुम्ही सावध राहा, तुकडे होऊ देऊ नका, विचार करून मतदान करा आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भाजपला मातीत संपवून टाका, असे वादग्रस्त आवाहन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्य्रात केले. इतकेच नव्हे, तर आपल्या या भाषणाचा व्हिडीओ व्हॉटस्अॅपवर उत्तर प्रदेशातील आपल्या नातेवाईकांना पाठवण्याचे आवाहनही त्यांनी केले.
मुंब्रा शहरामध्ये मूळच्या उत्तर प्रदेशातील रहिवाशांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे मुंब्य्रातूनच गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी भाजपचा रथ रोखण्याचा प्रयत्न केला. निवडणूक प्रचारासाठी आपले निकटवर्तीय उत्तर प्रदेशात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले; पण त्याआधी आपले हे भाषण व्हॉटस्अॅपच्या माध्यमातून उत्तर प्रदेशाच्या घराघरात पोहचवण्याचे आवाहन त्यांनी केले.
२०२४ मध्ये दिल्लीच्या सत्तेत कोण येणार, हे उत्तर प्रदेशच्या निकालावर अवलंबून आहे. ओवेसी यांचे नाव न घेता भाजपची सुपारी घेऊन काही जण उत्तर प्रदेशात निवडणुकीसाठी रिंगणात आहेत, असे ते म्हणाले. अशा लोकांपासून सावध राहा. कोणाला मतदान करायचे, हे सांगणार नाही, पण देशाचे भविष्य बिघडवणाऱ्या भाजपला संपवायचे असेल, तर हीच वेळ आहे, असे उत्तर प्रदेशात जाऊन सांगा, असेही आव्हाड यांनी सांगितले.
चौकट
एकजूट व्हा
भावनांवर राजकारण होत नाही. तुमच्यात फूट पाडण्याचे प्रयत्न होतील. तुमच्यात तुकडे होतील, पण जिंकणार भाजप. म्हणून एकजूट राहा, असे आवाहनही गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले.