
हरित, स्वच्छ भारतासाठी सायकल यात्रा; १० हजार किलोमीटरहून अधिकचा प्रवास
प्रकाश लिमये : सकाळ वृत्तसेवा
भाईंदर : हरित आणि स्वच्छ भारत (Green and clean India) हा संदेश देशभर पोहोचवण्यासाठी एका २५ वर्षीय तरुणाने सायकलवरून भारत यात्रेचा संकल्प (Cycling in India) सोडला आहे. आतापर्यंत १० हजार किलोमीटरचा (ten thousand kilometer travel) प्रवास करून हा युवक सध्या भाईंदरमध्ये दाखल झाला आहे. हरित आणि स्वच्छ भारत संकल्पनेतून पर्यावरण रक्षण (Environment care) आणि त्याचसोबत माणसे जोडणे हा उद्देश या तरुणाने मनाशी बाळगला आहे. उत्तर प्रदेशमधील जौनपूर येथे राहणारा शिवगोविंद पटेल (Shivgovind Patel) हा २५ वर्षीय तरुण आठ राज्यांचा सुमारे १० हजार किलोमीटरहून अधिक सायकल प्रवास करत नुकताच मुंबईत दाखल झाला आहे.
हेही वाचा: राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडेंवर गुन्हा; आक्षेपार्ह वक्तव्य अंगलट
सध्या त्याचा मुक्काम भाईंदरमध्ये आहे. प्रवासादरम्यान लोकांना झाडे लावण्याबाबत जागरूक करण्याचे, पर्यावरण रक्षण तसेच स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याचे काम शिवगोविंद करत आहे. उत्तर प्रदेशमधील आपल्या गावी मोबाईल दुरुस्ती आणि छपाईचे काम करणारा शिवगोविंद या संपूर्ण भारत यात्रेसाठी स्वत:च्या खिशातून खर्च करत आहे. मोबाईल दुरुस्तीचे काम करत असताना आपण दुसऱ्यांना मदत करण्यासाठी काय काय करू शकतो, असे विचार शिवगोविंदच्या मनात घोळू लागले. त्याला लिखाणाचीही आवड आहे.
आपल्या संपूर्ण भारत यात्रेवर तो एक पुस्तकदेखील लिहिणार आहे. लिखाणासोबतच एकदा तरी संपूर्ण भारत फिरायचा असे त्याचे स्वप्न होते. काही तरी करण्याची इच्छा त्याला स्वस्थ बसून देत नव्हती आणि त्यातूनच निसर्ग रक्षणासाठी काम करण्याची आणि त्यासाठी भारतभर फिरण्याची खूणगाठ त्याने मनाशी बांधली.
हेही वाचा: इमारत कोसळून मृत्यू झाल्यास पुनर्वसनाची जबाबदारी शासनाची : हायकोर्ट
३०० किलोमीटर अंतर एका दिवसात पार
३१ जुलै २०२१ रोजी शिवगोविंदने आपली यात्रा सुरू केली. आतापर्यंत उत्तर प्रदेश, दिल्ली, हरयाना, उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि गुजरात असा प्रवास करत तो काही दिवसांपूर्वीच मुंबईत दाखल झाला. विशेष म्हणजे सुरत ते मुंबई हे ३०० कि.मी.चे अंतर त्याने एका दिवसात कापले आहे.
शिवगोविंद महाराष्ट्रातून पुढे दक्षिण भारत आणि नंतर ईशान्य राज्यांमध्ये जाणार आहे. ७ ऑगस्टला त्याची ही यात्रा पूर्ण होणार आहे. त्यानंतरही त्याने हाती घेतलेले कार्य संपणार नाही. मथुरामधील वृंदावन येथे त्याने एक जागा पाहून ठेवली आहे. सामाजिक संस्थांच्या मदतीने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड तो करणार आहे आणि त्यासाठी एक संकेतस्थळदेखील सुरू करणार आहे.
या संपूर्ण प्रवासादरम्यान स्थानिक सायकलिंग ग्रुप, सामाजिक संस्था यांच्या भेटी घेत आहे. रस्त्यात भेटणाऱ्या सर्वांना झाडे लावण्यासाठी आणि स्वच्छता राखण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. आतापर्यंत भेटलेली माणसे खूपच चांगली, मदतीचा हात पुढे करणारी आणि सकारात्मक प्रतिसाद देणारी होती.
- शिवगोविंद, सायकलस्वार
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..