
ठाण्यात ११३ कोटींची पाणीपट्टी वसुली; स्मार्ट मीटर वादाच्या भोवऱ्यात
ठाणे : ठाणे महापालिकेने (Thane Municipal corporation) एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या कालावधीत तब्बल ११३ कोटी रुपयांची वसुली केली आहे. यामध्ये वादग्रस्त ठरलेल्या स्मार्ट मीटरद्वारे (smart meter) ४४ कोटी; तर नॉनमीटरद्वारे ६२ कोटींची वसुली करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. शहरातील वाढती पाणी गळती व पाणी चोरीच्या घटनांना (water robbery) आळा बसावा यासाठी पालिकेने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली. त्यातून स्मार्ट मीटरचा पर्याय समोर आणला गेला; मात्र हेच स्मार्ट मीटर वादाच्या भोवऱ्यात सापडत आहेत.
हेही वाचा: विनाअनुदानित शिक्षकांचा पेपर तपासणीवर बहिष्कार
यात अनेक मीटर सदोष आढळले असून चुकीच्या पद्धतीने बिले गेल्याचा आरोप नागरिकांकडून होऊ लागला. हा विषय लोकप्रतिनिधींनी महासभेत चर्चेला आणला. तसेच पूर्वीप्रमाणेच देयके वसूल करण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत केला होता, परंतु हा ठराव वेळेत प्राप्त झाला नसल्याचे सांगत पालिकेने जलमापकांच्या नोंदणीप्रमाणेच देयकाची वसुली सुरू ठेवली होती. तसेच या मीटरप्रमाणे बिल पाठवण्याबाबत ठोस निर्णय झालेला नाही.
स्मार्ट मीटरनुसार प्रती तीन महिन्यांनी जेवढा पाण्याचा वापर केला जाईल, तेवढे बिल मीटरधारकाला पाठवण्यात येणार आहे. ही पद्धत कार्यान्वित झाल्यावर पाण्याचा वापर निश्चित कमी होईल आणि पाणीपट्टी वसुलीही वेळेत होणार असल्याचा दावा प्रशासनाने केला. त्यानुसार स्मार्ट सीटी योजनेंतर्गत ठाणे शहरात एक लाख १३ हजार ३२८ स्मार्ट मीटर लावण्यात येणार आहेत. त्यात सध्याच्या घडीला ७७ हजार ठिकाणी हे स्मार्ट मीटर बसवण्यात आले असून, ४२ हजार ८०० मीटरधारकांकडून बिले वसूल करण्यात येत आहेत. त्यानुसार स्मार्ट मीटर बसवलेल्या मीटरधारकांकडून ४४ कोटी २० लाख ६९ हजार ८३८ रुपयांची वसुली करण्यात आली आहे; तर एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या वर्षाअखेरीपर्यंत एकूण ११३ कोटी ९३ लाख ९८ हजार ८२ रुपयांची पाणीपट्टी वसुली केली आहे.
वसुली १२० कोटीपर्यंत जाणार
पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला १५८ कोटी रुपयांच्या पाणी देयक वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ११३ कोटी ९३ लाख ९८ हजार ८२ रुपयांची वसुली पालिकेने केली आहे. त्यात जलमापक नसलेल्या नळ जोडणीधारकांकडून ६२ कोटी २९ लाख ४९ हजार ८१९ रुपयांची; तर जलमापक धारकांकडून ४४ कोटी २० लाख ६९ हजार ८३८ रुपयाची वसुली केली आहे. याशिवाय पालिकेच्या नागरी सुविधा केंद्रात सात कोटी ४३ लाख ७८ हजार ४२५ रुपयांची वसुली झाली आहे. येत्या काही दिवसांत ४५ कोटी रुपयांची वसुली करण्याचे आव्हान असले, तरी वसुलीचा आकडा १२० कोटीपर्यंत जाण्याची शक्यता पालिका सूत्रांकडून वर्तविली जात आहे.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..