
सिद्धेश्वर गावातील ग्रामस्थांची एकजूट
पाली, ता. २४ (वार्ताहर) : सुधागड तालुक्यातील सिद्धेश्वर गावातील ग्रामस्थ व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य गावचा पाणी प्रश्न सुटावा, यासाठी एकत्र आले आहेत. स्वयंप्रेरणेने एकजूट होऊन श्रमदान करून नुकतेच दोन वनराई बंधारे बांधले आहेत. सिद्धेश्वर ग्रामपंचायत कार्यालयाजवळ व शंकर मंदिराजवळील ओढ्यावर हे बंधारे बांधण्यात आले आहेत.
हाती कोयता, कुदळ, फावडे आदी सामग्री घेवून वृद्ध व महिलाही तरुणांच्या खांद्याला खांदा लावून काम करू लागले. या सगळ्यांसोबत आदिवासी बांधवही प्रचंड उर्जा घेऊन उतरले आणि हे दोन बंधारे बांधले. यामुळे येथील भूजल पातळी वाढणार आहे. त्यामुळे उन्हाळ्यात विहीर, तलाव, कूपनलिकांना मुबलक पाणी राहील. नागरिकांना वापरासाठी पाणी मिळेल, शिवाय पशुपक्ष्यांनाही पाणी उपलब्ध होणार आहे. या श्रमदान मोहिमेत सरपंच आशिका पवार, उपसरपंच शरद किंजावडे, सदस्य समृद्धी यादव, संजना फाळे, सुरेश पवार, सर्व सदस्य, ग्रामसेवक ए. टी. गोरड, तंटामुक्त अध्यक्ष बबन वाघमारे, गणेश महाले, सचिन मुंढे, रसिका वरघडे यांच्या माध्यमातून हे वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत.