माघारीमुळे थेट लढतींचे चित्र स्पष्ट

माघारीमुळे थेट लढतींचे चित्र स्पष्ट

Published on

माघारीमुळे थेट लढतींचे चित्र स्पष्ट
५० टक्के उमेदवारांची माघार; निवडणुकीची खरी रंगत आता सुरू
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २८ : रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी झालेल्या मोठ्या प्रमाणावरील माघारीमुळे निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले असून, खरी राजकीय रंगत सुरू झाली आहे. जिल्हा परिषद आणि १५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीत जवळपास ५० टक्के उमेदवारांनी माघार घेतल्याने थेट लढतींचे स्वरूप समोर आले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात उमेदवारांनी निवडणुकीतून काढता पाय घेतल्याची घटना रायगड जिल्ह्याच्या राजकारणात पहिल्यांदाच घडली आहे. वाढता निवडणूक खर्च, प्रचारासाठी लागणारा आर्थिक बोजा आणि विजयाची खात्री नसल्याने अनेक उमेदवारांनी माघार घेतल्याचा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.
रायगड जिल्हा परिषदेसाठी सुरुवातीला एकूण ३६८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यापैकी छाननी प्रक्रियेत सात उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. त्यानंतर अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल १८८ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या ५९ गटांमध्ये केवळ १७३ उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहिले आहेत. एकूण माघारींचे प्रमाण ४७ टक्के इतके असून, ही संख्या रायगडच्या राजकीय इतिहासात अभूतपूर्व मानली जात आहे.
दरम्यान, पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्येही याच स्वरूपाचे चित्र पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांमधील ११८ जागांसाठी तब्बल ६७८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी २२ अर्ज छाननीत बाद झाले. त्यानंतर माघारीच्या अंतिम दिवशी ३२७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने पंचायत समित्यांमधील माघारींचे प्रमाण ४८.५२ टक्क्यांवर पोहोचले आहे. माघारीनंतर बहुतांश मतदारसंघांमध्ये दुहेरी किंवा तिहेरी लढती निश्चित झाल्या असून, त्यामुळे मतदारांमध्ये उत्सुकता वाढली आहे. थेट लढतींमुळे प्रचार अधिक तीव्र होण्याची शक्यता असून, आगामी दिवसांत रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण अधिक तापणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com