सी. डी. देशमुख यांच्या नाते येथील जन्मस्थळी भव्य स्मारक व्हावे
सी. डी. देशमुख यांच्या नाते येथील जन्मस्थळी भव्य स्मारक व्हावे
मंत्री भरत गोगावले यांची मुख्यमंत्र्यांकडे १० कोटींच्या निधीची मागणी
महाड, ता. १४ (बातमीदार) : स्वतंत्र भारताचे तिसरे अर्थमंत्री आणि भारतीय रिझर्व बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर चिंतामण द्वारकानाथ देशमुख यांचे जन्मगाव असलेल्या महाड तालुक्यातील नाते गावातील त्यांच्या जन्मस्थळाची दुरवस्था झाली आहे. या घराची पुनर्बांधणी करून सी. डी. देशमुख स्मारकात रूपांतर करण्यात यावे आणि त्यासाठी १० कोटी रुपये इतका निधी मंजूर करून द्यावा, अशी मागणी मंत्री भरत गोगावले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाने चार ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्याचा टप्पा गाठला आहे. आज आपला देश प्रगती करत असताना देशाच्या प्रगतीचा पाया रचण्यात ज्यांनी योगदान दिले; त्या सी.डी.देशमुख यांचे नाते गावातील जन्मस्थळ दुर्लक्षित आहे. सी. डी. देशमुख यांनी देशासाठी दिलेले योगदान लक्षात घेता भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानितदेखील केले आहे. डॉ. सी. डी. देशमुख यांनी देशाचे तिसरे अर्थमंत्री म्हणून काम पाहिले. पण फार कमी लोकांना माहिती आहे की, त्यांनी रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे. देशमुख यांना ब्रिटिश सरकारने रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून नियुक्त केले. सीडी देशमुख यांनी ११ ऑगस्ट १९४३ ते ३० जून १९४९ पर्यंत हे पद भूषवले. देशाच्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर पद भूषवणारे ते पहिले भारतीय होते. त्यांच्या गुणवत्तेच्या आधारे ब्रिटिश राजवटीने त्यांना सर ही पदवी बहाल केली. अशा या महान व्यक्तीची ओळख संपूर्ण देशाला व्हावी यासाठी त्यांच्या जीर्ण घराच्या वास्तूची पुनर्बांधणी करून त्याचे स्मारकात रूपांतर करणे गरजेचे आहे.
..................
अभ्यास केंद्राची मागणी
मुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या पत्रात मंत्री गोगावले यांनी नमूद केले आहे की, सी. डी. देशमुख यांचे जन्मगाव नाते हे महाड मतदारसंघात येते. त्यांनी केवळ आर्थिक क्षेत्रातच नव्हे, तर सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातही देशासाठी मोलाचे कार्य केले आहे. अशा थोर व्यक्तिमत्त्वाची ओळख संपूर्ण देशाला व्हावी, तसेच युवकांना त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी, यासाठी नाते गावातील त्यांच्या जन्मस्थळी भव्य स्मारक उभारणे अत्यावश्यक आहे. सध्या ही वास्तू अत्यंत जीर्ण अवस्थेत असून, ती कधीही कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वास्तूची नव्याने उभारणी करून, त्या ठिकाणी संग्रहालय, माहिती फलक, ग्रंथसंपदा व अभ्यास केंद्र उभारण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. नाते गावातील ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांकडूनही अनेक वर्षांपासून स्मारक उभारण्याची मागणी केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

