
मुंबई ‘एलईडी’ने उजळणार
मुंबई, ता. १४ : मुंबई नगरी ‘एलईडी’ने उजळणार असून रस्त्यावरील पारंपरिक दिवे हायटेक होणार आहेत. पालिकेने जुने दिवे बदलण्यास सुरुवात केली असून ते ‘एलईडी’मध्ये रूपांतरित करण्यात येत आहेत. नव्या दिव्यांची उभारणी, सुधारणा, स्थलांतरण व देखभालीची कामे करण्यात येत आहेत. मे. अदाणी इलेक्ट्रिसिटीला त्याचे काम सोपवण्यात आले आहे.
मुंबईतील अनेक रस्त्यांवरील दिवे आता एलईडी स्वरूपातील होऊ लागले आहेत. मुंबई शहरात बेस्ट आणि पश्चिम व पूर्व उपनगरात महावितरण कामे करत असून आता त्या रस्त्यांवरील दिव्यांचेही एलईडी पथदिव्यांत रूपांतर होणार आहे. त्यात प्रथमतः २० टक्के व त्यानंतर बाकी दिव्यांचे रूपांतर टप्प्याटप्याने करायचे आहे. त्याबाबतचे मागणी पत्र तयार करून महापालिकेला सादर केल्यानंतर प्रत्येक खर्चातील १० टक्के भांडवली रक्कम आगाऊ देण्यात येणार आहे.
८४,४५७ दिवे एलईडी
पालिकेच्या हद्दीतील पदपथांवरील पथदिव्यांची संख्याही १ कोटी ३६ लाख ३९२ इतकी आहे. सध्या बेस्ट, अदाणी आणि महावितरण पथदिव्यांची देखभाल करत आहे. त्यातील अदाणी इलेक्ट्रिसिटी कंपनी वीज पुरवत असलेल्या ८७ हजार ३४७ पैकी ८४ हजार ४५७ दिवे एलईडी करण्यात आले आहेत. त्यानंतर आता २ हजार ८९० दिवे एलईडी करण्यात येणार आहेत. महापालिका आयुक्तांची त्यास अंतिम मंजुरी मिळाली असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.