
मुंबईतील प्रदूषण हा अतिशय चिंतेचा विषय
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : मुंबई शहराचे वैभव टिकवून ठेवण्यासाठी मुंबई स्वच्छ व सुंदर ठेवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी हवा, पाणी आणि ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यात यावा. मुंबई स्वच्छ, सुंदर राहिली तरच या शहराचे वैभव कायम राहील, त्यासाठी अधिक प्रयत्न करण्यात यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी विरोधी पक्षाने मांडलेल्या प्रस्तावावर बोलताना केली.
विरोधी पक्षाने नियम २९३ मांडलेल्या प्रस्तावावर छगन भुजबळ यांनी सांगितले की, मुंबईत अनेक स्कायवॉक उभारण्यात आले आहेत. यामुळे शहराची स्कायलाईन खराब होत आहे. वापरात नसलेले स्कायवॉक काढून टाकण्यात यावेत, अशीही मागणी त्यांनी केली. मुंबईत हवा, पाणी आणि ध्वनिप्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यावर ठोस उपाययोजना होताना दिसत नाही. सगळीकडे बांधकामे सुरू आहेत. गाड्यांचे प्रमाण वाढले, लोकांना श्वसनाचा त्रास होतोय. गत वर्षापासून ही परिस्थिती आहे. राज्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई विभाग नेमके काय करत आहे, हा सवाल असल्याचे त्यांनी सांगितले. हवेच्या गुणवत्तेची पातळी धोक्याचे चिन्ह ओलांडत असतानाही नगण्य कारवाई झाली असल्याचे आमदार छगन भुजबळ यांनी सांगितले.