रेवस-रेड्डी महामार्गामुळे कासवांच्या घरट्यांना धोका?

रेवस-रेड्डी महामार्गामुळे कासवांच्या घरट्यांना धोका?
Published on

मुंबई, ता. १० : राज्य सरकारच्या रेवस-रेड्डी सागरी महामार्गाच्या विस्तारामुळे सिंधुदुर्गातील ऑलिव्ह रिडले कासवांच्या घरट्यांच्या किमान दोन ठिकाणी परिणाम होण्याची शक्यता आहे. रत्नागिरीतील इतर चार ठिकाणच्या घरट्यांनाही धोका असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाद्वारे (एमएसआरडीसी) केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला सादर करण्यात आलेल्या अहवालावरून हे स्पष्ट झाले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तांबळदेग आणि वायंगणीमधील समुद्रकिनाऱ्यांवर कासवांचे वास्तव्य आहे. रत्नागिरीतील आंजर्ले, वेळास, केळशी आणि दुफोळ समुद्रकिनारे कासवांचे घर म्हणून ओळखले जाते. सिंधुदुर्गातही मालवणच्या इकोसेन्सिटिव्ह बफर झोनमधून महामार्ग जाणार आहे. त्याशिवाय कुणकेश्वर समुद्रकिनाऱ्यावर प्रवाळ खडकांवरून आणि मिठमुंबरीतील वाळूच्या परिसरातून हा मार्ग जात असल्याचे कागदपत्रातून दिसते. तारामुंब्री, नारिंग्री, आचरा, गड इत्यादींसह महत्त्वाचे जलस्रोत असणाऱ्या आणि कार्ले व मोचेमाड नद्या आणि केळूस खाडीलाही याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

रत्नागिरीत केळशी समुद्रकिनारी कासवांच्या घरट्याची जागा प्रस्तावित प्रकल्पापासून ५० मीटर अंतरावर आहे. वेळास आणि आंजर्ले घरटी ठिकाणे प्रस्तावित प्रकल्पापासून अनुक्रमे १३० आणि २१० मीटर अंतरावर आहेत. दाभोळमधील खाडीच्या आसपास पसरलेल्या कासवांच्या घरट्यांच्या जागेवर पूल बांधण्यात येणार आहे. तेथील दोन खांबांमधील अंतर १५० मीटर आहे. त्यामुळे कासवांच्या घरट्याच्या जागेला त्रास होणार नाही, असे कागदपत्रांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

प्रकल्पासाठी आम्ही परिसराचे सर्वेक्षण केले आहे. प्रकल्प पुढे नेताना पर्यावरणाला कमीत कमी नुकसान पोचेल, असा आमचा प्रयत्न असल्याचे ‘एमएसआरडीसी’च्या एका कार्यकारी अभियंत्याने सांगितले.

विकासाची काळजीपूर्वक योजना गरजेची
बहुतेक ठिकाणी प्रकल्पाचे काम वास्तविक घरट्यांपासून दूर आहे. असे असले तरी पर्यटनामुळे या प्रदेशातील समुद्रकिनाऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी स्थानिकांकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे हा विरोध वाढण्याची शक्यता आहे. कासवांच्या घरट्यांचे संवर्धन करण्यासाठी आगामी विकासाची अत्यंत काळजीपूर्वक योजना करणे आवश्यक आहे, असे वन विभागासोबत काम करणाऱ्या एका तज्ज्ञाने सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.