शनिवारच्या पाठ्यपुस्तकांचा आठवडाभर ताण

शनिवारच्या पाठ्यपुस्तकांचा आठवडाभर ताण

Published on

मुंबई, ता. ७ : शालेय मुलांचे आरोग्य लक्षात घेऊन त्यांच्या दप्तराचे ओझे हे किती प्रमाणात असावे, यासाठी राज्य सरकारने २१ जुलै २०१५ रोजी जीआर काढला. तर केंद्रीय शिक्षण विभागाने यासाठी ‘स्कूल बॅग धोरण २०२०’ जाहीर केले आहे. मात्र, या धोरणाला मुंबई आणि परिसरातील खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडून हरताळ फासला आहे.
सरकारी, अनुदानित शाळांप्रमाणेच खासगी शाळांनाही शनिवारी सुट्टी असल्याने या दिवसाच्या अभ्यासक्रमाचा संपूर्ण भार आठवडाभर विद्यार्थ्यांवर लादला जात असल्याने दप्तराचे ओझे खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. केंद्रीय शिक्षण विभागाच्या धोरणानुसार प्रत्येक विद्यार्थ्याच्या वजनाच्या केवळ दहा टक्के इतकेच दप्तराचे वजन असणे आवश्यक आहे. यासाठी राज्यातील आणि देशातील सर्वच शाळा आणि संस्थांनी हे नियम पाळणे बंधनकारक आहे. त्यातही केंद्राच्या धोरणात पूर्व प्राथमिकसाठी असलेल्या मुलांना दप्तरच नाही. इयत्ता पहिली आणि दुसरीकरिता एक वही आणि तिसरी ते पाचवीसाठी एक वर्गातील आणि एक गृहपाठ अशा दोन वह्या तर सहावी ते आठवीकरिता फाइल सुटे कागद नोट्स काढण्यासाठी वापरण्याची मुभा आहे. शिवाय देशातील शाळांचे यासाठी वेळापत्रक कसे असावे, यासाठीही केंद्राच्या धोरणात सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, राज्यातील शाळांकडून या सूचनांना डावलून विद्यार्थ्यांच्या पाठीवर त्याच्या मर्यादेपेक्षा ओझे लादत असल्याच्या तक्रारी पालकांकडून केल्या जात आहेत.
--
‍शिक्षकांचे अक्षम्य दुर्लक्ष
राज्य आणि केंद्राच्या धोरणानुसार दप्तराचे ओझे तपासण्यासाठी महत्त्वाची जबाबदारी ही शिक्षकांवर देण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्येक शाळांतील शिक्षकांना नियमितपणे विद्यार्थ्यांचे दप्तर तपासणे बंधनकारक आहे. शिवाय कोणत्याही विद्यार्थ्याला दप्तराचे आझे वाटणार नाही, याप्रमाणे वेळापत्रक आखणे आवश्यक आहे. मात्र, त्याकडे शिक्षकांचे दुर्लक्ष होत असून शनिवार- रविवार सुट्टी घेणाऱ्या शाळांकडून आठवडाभर विद्यार्थ्यांवर पुस्तकांचा ताण वाढत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
--
इयत्तानिहाय दप्तराचे वजन
पूर्व प्राथमिक १० ते १६ किलो दप्तराविना
पहिली, दुसरी १६ ते २२ किलो १.६ ते २.२ किलो
तिसरी ते पाचवी १५ ते २५ किलो १.५ ते २.५ किलो
सहावी, सातवी २० ते ३० किलो २ ते ३ किलो
आठवी २५ ते ४० किलो २.५ ते ४ किलो
नववी, दहावी २५ ते ४५ किलो २.५ ते ४.५ किलो
अकरावी, बारावी ३५ ते ५० किलो ३.५ ते ५ किलो
---------------------
तक्रार केल्यास कारवाई होणार
मुलांचे आरोग्य खूप महत्त्वाचे असल्याने त्यांच्या पाठीवर किती ओझे असावे, यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. शिवाय केंद्राच्याही धोरणाची अंमलबजावणी सुरू आहे. मात्र, कोणत्या शाळांकडून मुलांवर दप्तराचे अधिकचे ओझे लादल्याच्या तक्रारी आल्या तर त्यावर निश्चितच कारवाई केली जाईल, अशी माहिती शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.