मुख्य जलवाहिन्या होणार सुरक्षित

मुख्य जलवाहिन्या होणार सुरक्षित

Published on

मुख्य जलवाहिन्या होणार सुरक्षित
संरक्षक भिंत उभारणीला गती; एल, एम पश्चिम भागात ११.५५ कोटींचा प्रकल्प मंजुरीच्या मार्गावर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : महापालिका जल अभियंता विभागामार्फत मुख्य जलवाहिन्या सुरक्षित करण्यावर भर देण्यात येत असून, या कामाला गती देण्यात आली आहे. सुरुवातीला एल, एम पश्चिम विभागातील काँक्रीट संरक्षक भिंत बांधण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ११.५५ कोटी रुपयांच्या कंत्राटास प्रशासकीय मान्यता मिळविण्याची शिफारस करण्यात आली आहे.
२००६ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्र. १४० नुसार मुख्य जलवाहिन्यालगतच्या अतिक्रमणांवर बंदी घालत १० मीटर अंतरावरील जागा बांधकाममुक्त ठेवण्याचे निर्देश दिले होते. त्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेने जलवाहिन्यालगत संरक्षक भिंत उभारण्याची योजना हाती घेतली होती.
‘एल’ विभागात आतापर्यंत २,७५५ मीटर लांबीची भिंत बांधण्यात आली आहे; मात्र अतिक्रमणांमुळे उर्वरित ८,२५३ मीटर भागावर काम होऊ शकले नाही. आता अतिक्रमणविरहित भागांवर भिंत उभारण्याची तयारी सुरू आहे. ६ सप्टेंबर २०२३ रोजी झालेल्या बैठकीत या प्रकल्पाला ‘अत्यावश्यक नागरी पायाभूत प्रकल्प’ म्हणून घोषित करण्याचा निर्णय झाला. अतिक्रमणे दूर झाल्यानंतर पुन्हा तशी समस्या उद्भवू नये म्हणून कायमस्वरूपी संरक्षक भिंत उभारण्याचे ठरले.
या कामासाठी डिसेंबर २०२४ रोजी ई-निविदा मागविण्यात आल्या. निविदा सादर करण्याच्या तारखेनंतर तीन बोली प्राप्त झाल्या. तपासणीनंतर दोन बोली प्रतिसादात्मक ठरल्या. त्यापैकी मे. कमला कन्स्ट्रक्शन कंपनी हिने कार्यालयीन अंदाजित किंमतीच्या (-)१६.०३ टक्के दराने ८.९८ कोटी इतका देकार सादर केला, तर मे. डी.बी. इन्फ्राटेक हिने (-)१२.६९ टक्के दराने बोली दिली.
कमी दर आणि अनुभव लक्षात घेऊन कमला कन्स्ट्रक्शन कंपनीची बोली सर्वाधिक लाभदायक मानण्यात आली आहे. कंपनीकडून आवश्यक सुरक्षा अनामत रक्कम ८६.२६ लाख भरण्यात आली आहे. प्रकल्पाचा एकूण कामाचा खर्च ११,५५,८४,५६६.६६, एकूण अंदाजित खर्च १३,९८,४६,७२२ कामाचा कालावधी पावसाळा धरून २४ महिने निश्चित करण्यात आला आहे.
या कामासाठीचा खर्च जल अभियंता विभागाच्या भांडवली अर्थसंकल्पातून (२०२५–२६) भागविण्यात येईल. प्राथमिक तरतूद २० कोटी असून, उर्वरित रक्कम सुधारित अर्थसंकल्पात राखली जाणार आहे.
मंजुरी मिळाल्यानंतर प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल. या भिंतीमुळे तानसा जलवाहिन्यालगतची जमीन सुरक्षित राहील, अतिक्रमणे रोखली जातील आणि जलपुरवठा यंत्रणा अधिक सुरळीत व सुरक्षित होईल.

२४ महिन्यांत काम पूर्ण करणार
मुख्य जलवाहिन्यालगत काँक्रीट संरक्षक भिंत उभारणीसाठी ‘एल’ व ‘एम/पश्चिम’ विभागात ११.५५ कोटींचा प्रकल्प मंजुरीच्या उंबरठ्यावर असून, कमला कन्स्ट्रक्शन कंपनीकडे कंत्राट देण्याची शिफारस करण्यात आली आहे. हे काम २४ महिन्यांत पूर्ण होणार असून, मुंबईच्या जलपुरवठा सुरक्षेसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com