क्षयरोगाच्या सुप्तावस्थेतील जीवाणूंना अँटिबायोटिक्सना निष्प्रभ करणारे ''सुरक्षा कवच''
क्षयरोग जीवाणूंना अँटिबायोटिक्सपासून वाचवणारे ‘सुरक्षा कवच’
आयआयटी मुंबईच्या संशोधकांचा मोठा शोध; उपचारांचा कालावधी कमी होण्याची शक्यता
मुंबई, ता. ३ : क्षयरोगावर (टीबी) नियंत्रण मिळवण्यासाठी जगभरात सुरू असलेल्या संशोधनात आता आयआयटी मुंबईतील संशोधकांनी महत्त्वपूर्ण भर घातली आहे. त्यांनी टीबीचे सुप्तावस्थेतील जीवाणू अँटिबायोटिक्सचा उपचार होऊनही कसे तग धरून राहतात, यामागच्या यंत्रणेचा शोध घेतला आहे.
आयआयटी मुंबईच्या प्रो. शोभना कपूर आणि मोनॅश विद्यापीठाच्या प्राध्यापिका मेरी-इसाबेल ॲग्विलार यांच्या नेतृत्वाखालील या पथकाने केलेल्या या अभ्यासाचे निष्कर्ष नुकतेच ‘केमिकल सायन्स’ नियतकालिकात प्रकाशित झाले आहेत. या संशोधनाने केवळ नवीन अँटिबायोटिक्स विकसित करण्याऐवजी, सध्याच्या औषधांनाच अधिक प्रभावी बनवण्याचा मार्ग दाखवला आहे.
संशोधकांनी स्पष्ट केले की, टीबीचे जीवाणू सक्रिय अवस्थेतून सुप्त अवस्थेत जाताना त्यांच्या पेशी पटलाच्या संरचनेत मोठे बदल होतात. सुप्त जीवाणूंचे पटल अधिक ताठर आणि घट्ट बनते. या ताठरपणामुळे, रिफाब्युटिनसारखी अँटिबायोटिक्स औषधे पेशी पटलातून आत प्रवेश करू शकत नाहीत. हे ताठर पटल औषधांसाठी ‘पहिला आणि सर्वात मजबूत अडथळा’ ठरतो, जे जीवाणूंचे ‘सुरक्षा कवच’ म्हणून काम करते.
संशोधकांनी सुचवले आहे की, जर सध्याची अँटिबायोटिक्स औषधे बाह्य पटल शिथिल करू शकणाऱ्या रेणूंसोबत दिली गेली, तर ती अधिक परिणामकारक ठरतील. हे पेप्टाइड्स पटलाला किंचित भेद्य बनवतील, ज्यामुळे अँटिबायोटिक्स आत प्रवेश करू शकतील आणि जीवाणू प्रतिकारशक्ती विकसित करण्यापूर्वीच नष्ट होतील.
----------------------
उपचाराचा कालावधी होणार कमी
जीवाणूंच्या तग धरून राहण्याच्या यंत्रणेत हस्तक्षेप करता आल्यास, टीबीवरील सध्याची औषधे अधिक प्रभावी ठरू शकतील. यामुळे टीबीच्या उपचारांचा दीर्घकाळ चालणारा कालावधी कमी होण्यास आणि रोगाचे उच्चाटन अधिक प्रभावीपणे होण्यास मदत मिळणार आहे. या नवीन अभ्यासाच्या आधारावर लवकरच टीबीच्या उपचार पद्धतींमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
----------------
टीबीची २०२३-२४मधील आकडेवारी
२०२३ या वर्षात जगभरात सुमारे एक कोटी आठ लाख लोक टीबीने ग्रासले, तर याच काळात केवळ टीबीच्या आजाराने १२ लाख ५० हजार लोकांचा मृत्यू झाला, तर देशात २०२४ मध्ये सुमारे २६ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली असल्याचेही विविध अहवालातून समोर आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

