संमेलनाच्या उपस्थितीसाठी विद्यार्थ्यांवर भिस्त

संमेलनाच्या उपस्थितीसाठी विद्यार्थ्यांवर भिस्त

Published on

संमेलनाच्या उपस्थितीसाठी विद्यार्थ्यांवर भिस्त
रयत संस्थेसह माध्यमिक विभागाने काढले आदेश

संजीव भागवत : सकाळ वृत्तसेवा
सातारा, ता. ३१ : अखिल भारतीय साहित्य संमेलनाला सातारा आणि परिसरातील शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतील, यासाठीचे नियोजन स्थानिकांकडून करण्यात आले आहे. यात ग्रंथदिंडीपासून ते तीन दिवसांत होणाऱ्या प्रत्येक चर्चासत्रामध्ये विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय राहील, यासाठीची खबरदारी येथील शिक्षण संस्थांसह शिक्षण विभागाकडून घेण्यात आली आहे.

साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेने संमेलनाच्या पहिल्या दिवशी गुरुवारी (ता. १) सुरू होणाऱ्या ग्रंथदिंडीपासून ते समारोपाच्या कार्यक्रमापर्यंत प्रत्येक चर्चासत्राला स्थानिक महाविद्यालयांतील विद्यार्थी, त्यांच्या उपस्थितीची संख्या, शिक्षकांची उपस्थिती आणि त्यांची संख्याही निश्चित करून त्यासाठीचा आदेश जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण अधिकारी धनंजय चोपडे यांनीही आपल्या विभागातील अधिकाऱ्यांना चित्ररथ व ग्रंथदिंडीच्या बंदोबस्त कार्यक्रमासाठी सर्व शाळांतील प्रशिक्षित अधिकाऱ्यांना गणवेशात उपस्थित राहण्याचा आदेश जारी केला आहे. तसेच शाळांतील विद्यार्थ्यांनाही उपस्थितीसाठी सूचना दिल्या आहेत.

रयत संस्थेने विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसह इतर अनेक प्रकारच्या नियोजनात आपला सहभाग कसा अधिक दिसून येईल, यासाठीची खबरदारी घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर संस्थेच्या सचिवांनी बैठक घेऊन नियोजन केले आहे. यात सर्व शाखाप्रमुखांनी आपल्या शाखेच्या दर्शनी भागावर साहित्य संमेलनाचे फलक लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. या संमेलनासाठी संस्थेच्या सर्वच शाळा-महाविद्यालयांना यादरम्यान नियमित शैक्षणिक कामकाजापासून मुभाही देण्यात आली आहे. दरम्यान, अखिल भारतीय साहित्य संमेलनात यापूर्वी कधीही रयतचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांना सन्मानाने बोलविण्यात आले नव्हते; मात्र त्यांच्याच संस्थेतील विद्यार्थी, शिक्षक साताऱ्यातील या संमेलनात उपस्थितीची उणीव भरून काढतील, असे येथील स्थानिक साहित्यिक, विचारवंतांचे म्हणणे आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी यांनी उपस्थित राहावे, यासाठी जर शिक्षण विभाग काही प्रयत्न करीत तसे आदेश काढणार असेल तर ती स्वागतार्ह बाब आहे. संमेलनाचे चारही दिवस त्यांनी शिक्षक, विद्यार्थी यांना तिथे त्यांच्या अध्ययन, अध्यापन कार्याचा एक भाग म्हणून उपस्थिती आवश्यक केली तर अधिक उत्तम. असे खरेतर प्रत्येक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या वेळी व्हायला हवे.
- श्रीपाद भालचंद्र जोशी, माजी अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com