
संगणक परिचालकांचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशिल
पालघर, ता. ११ (बातमीदार) : राज्यातील २९ हजार ग्रामपंचायतींमध्ये मागील ११ वर्षांपासून अनेक संगणक परिचालक काम करत आहेत. यावलकर समितीच्या शिफारशीनुसार ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारी दर्जा व किमान वेतन मिळणे या प्रमुख मागणीसाठी हिवाळी अधिवेशनावर नुकतेच आंदोलन करण्यात आले. त्या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्न सोडवण्याचा शब्द दिला; तर ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी लेखी आश्वासन दिले आहे. याचाच एक भाग म्हणून पालघर जिल्हा संगणक परिचालक संघटनेच्या वतीने केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. तसेच हा प्रलंबित प्रश्न सोडवण्याची मागणी केली. त्यावर मंत्री पाटील यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्याशी बोलून हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे संघटनेच्या शिष्टमंडळाला आश्वासित केले.