
नादुरुस्त ट्रकला धडकून सुरक्षा रक्षकाचा मृत्यू
नवी मुंबई, ता. १५ (वार्ताहर) : वाशी खाडी पुलावर बंद स्थितीत उभ्या असलेल्या मालवाहू ट्रकवर पाठीमागून भरधाव वेगाने येणारी मोटरसायकल धडकल्याने महाराष्ट्र सुरक्षा रक्षक मंडळात कार्यरत असणाऱ्या राजू जनार्दन पारखे (वय ३१) याचा मृत्यू झाला. तो कोपरखैरणेतील उद्यानात ड्युटीसाठी जात असताना आज (ता. १५) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघाताला तो जबाबदार असल्याचे आढळून आल्याने वाशी पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
ट्रकचालक शिवशंकर गिरी (वय ४२, रा. तुर्भे एमआयडीसी) हा शनिवारी (ता. १४) रात्री एमआयडीसीतून माल पोहोचवण्यासाठी मुंबईत गेला होता. तो मध्यरात्री मुंबईहून तुर्भे येथे परतत होता. पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास वाशी खाडी पुलावर त्याचा ट्रक बंद पडल्याने पुलावर रस्त्याच्या बाजूला उभा करून ठेवला होता. त्यानंतर ट्रकच्या दुरुस्तीसाठी मॅकेनिकची वाट पाहत पाठीमागून येणाऱ्या वाहनांना सिग्नल देण्यासाठी रस्त्यावर उभा होता. याच वेळी मानखुर्द येथून कोपरखैरणे सेक्टर ८ मधील उद्यानात सुरक्षेसाठी जात असताना राजू मोटरसायकलवरून भरधाव वेगात आला. या वेळी त्याने ट्रकच्या पाठीमागे सिग्नल देण्यासाठी उभ्या असलेल्या ट्रकचालकाच्या इशाऱ्याकडे न पाहता ट्रकवर मोटरसायकलसह जोरात धडकला. तो गंभीर जखमी झाल्याने त्याला वाशी पोलिसांनी महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले; मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.