
ई चलानद्वारे ३५ हजार चालकावर कारवाई
पालघर, ता. ३१ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहनचालकांना शिस्तीचे धडे देण्याबरोबरच कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यासाठी पोलिसांनी आता या बेशिस्त वाहनचालकांना कायदेशीर नोटिसा बजावल्या आहेत. यात ३५ हजार बेशिस्त वाहनचालकाकडून तीन कोटी तीस लाखांच्या वसुलीसाठी नोटिसा बजावून १० फेब्रुवारीपर्यंत दंड भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्यात २०१९ पासून एक राज्य एक चलन कार्यक्रम सुरू झाला आहे. त्यानुसार पालघर जिल्ह्यात दंड न भरलेले वाहनधारकांच्या दंड चलनाची संख्या ३५ हजार ७३ इतकी असून त्यांची थकीत रक्कम तीन कोटी तीस लाख रुपये इतकी आहे. वाहनधारकांना त्यांच्या नोंदणीकृत भ्रमणध्वनीवर संदेशाद्वारे दंड चलनाची तडजोड करण्याच्या सूचना देऊनही त्यांनी आजतागायत रकमेचा भरणा केलेला नाही. अशा दंडधारकांनी दंड भरावा, यासाठी पालघरच्या विधी व न्याय प्राधिकरण विभागामार्फत वाहतूक शाखेकडून संबंधितांना शेवटची संधी दिली आहे. त्यानुसार १० फेब्रुवारीपर्यंत दंड भरणा न केल्यास त्यांना ११ फेब्रुवारीला होणाऱ्या लोक अदालतील हजर व्हावे लागणार आहे.