
हवामान बदलामुळे सर्दी, खोकल्याचे रुग्ण
वाशी, ता. ६ (बातमीदार) ः काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होत आहे. कधी अचानक थंडीमध्ये वाढ होत आहे, तर मध्येच गरम होत असल्याने बदलत्या हवामानामुळे सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत.
नवी मुंबई शहरात मागील काही दिवसांत वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहेत. त्यामुळे लहान मुलांसह ज्येष्ठांना विविध आजारांनी ग्रासले आहे. वाशी येथील महापालिका रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात दिवसाला सरासरी १ हजार ते ११०० पर्यंत बाह्यरुग्ण पाहायला मिळतात; परंतु सातत्याने होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे पालिका रुग्णालयातील संख्याही वाढू लागली आहे. नवी मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात असून सातत्याने होत असलेल्या वातावरण बदलांमुळे डोकेदुखी तसेच ताप, सर्दी, तसेच खोकला वाढत आहे.
-------------------------
शहरातील वातावरणात झपाट्याने बदल होत असल्याने असंतुलित वातावरणामुळे रुग्ण आजारी पडण्याच्या संख्येत वाढ झाली आहे. सध्या दिवसाला हजार ते ११०० असलेली रुग्णसंख्या १५०० च्या पुढे गेली आहे. त्यामुळे नागरिकांनीही योग्य ती काळजी घ्यावी.
- डॉ. प्रशांत जवादे, वैद्यकीय अधिक्षक, वाशी रुग्णालय नमुंमपा