
तीन अपत्यांवरून अधिकारी अडचणीत
जुईनगर, ता.७ (बातमीदार)ः तीन अपत्ये असणाऱ्या अधिकाऱ्यांना नवी मुंबई महापालिका प्रशासनातर्फे सेवेत बढती दिली जात असल्याचा आरोप आवाज फाउंडेशनने केला आहे. विशेष म्हणजे, तक्रार केलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी प्रशासनाकडून त्यांना प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आल्याचा आरोप फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आला असून याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
शासकीय सेवेत गट अ,ब,क,ड संवर्गात २८ मार्च २००५ च्या शासन निर्णयानुसार तिसरे अपत्ये असलेल्या कर्मचाऱ्यांची चाचणी नवी मुंबई महापालिकेकडून करण्यात आली नसल्याने ४० कर्मचारी पालिकेत भ्रष्ट मार्गाने सेवा करत असल्याची आरोप आवाज फाउंडेशनने केला आहे. यापैकी नऊ कर्मचाऱ्यांची माहिती फाउंडेशनने पुराव्यानिशी सादर केली आहे. त्यात पालिकेच्या अग्निशमन दल व एक पालिकेच्या शाळा क्रमांक ११५ मधील शिक्षक व लेखा विभागातील कर्मचाऱ्याचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती लपवण्यात आल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा आहे. तसेच याबाबत १ मार्च २०२२ रोजी तत्कालीन आयुक्तांनी मंत्रालयातील सामान्य व नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांना निवेदन देखील देण्यात आले होते. मात्र, त्या निवेदनानंतरही पालिकास्तरावर वर्षभरात कोणतीही कारवाई झाली नसल्याचे शेख यांनी सांगितले. याबाबत प्रशासन विभागाचे उपायुक्त नितीन नार्वेकर यांच्याशी संपर्क साधला असता, आपण दुसऱ्या कार्यक्रमात व्यस्त असल्याने नंतर माहिती देतो असे सांगितले.