
घरफोडीच्या गुन्ह्यांतील आरोपीस १५ वर्षांनी अटक
अंधेरी, ता. ९ (बातमीदार) ः गेल्या १५ वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांतील आरोपीला अटक करण्यात मालाड पोलिसांना यश आले आहे. सूरया ऊर्फ सूर्या सुंदर मुत्तू असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून अटक टाळण्यासाठी सूर्या हा मुंबई व कर्नाटक येथील मूळ गावी स्वतःचे अस्तित्व बदलून राहत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
२००८ मध्ये मालाड पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक घरफोडीची घटना घडली होती. या प्रकरणी मालाड पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली होती. तपासात सूर्या याचा सहभाग उघडकीस आला होता. मात्र घरफोडीनंतर तो पळून गेला होता. तो राहत असलेली कांदिवलीतील चारकोप, भाब्रेकरनगरातील शक्ती अपार्टमेंट ही इमारत एसआरए पुनवर्सन योजनेंतर्गत गेली होती. त्यानंतर तो कायमचा पळून गेला होता. गेल्या पंधरा वर्षांपासून तो कर्नाटकच्या मूळगावी राहत होता. अधूनमधून मुंबईत आल्यानंतर तो पुन्हा त्याच्या गावी पळून जात होता. त्याची माहिती काढत असताना सूर्या हा मालाड परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र आडाणे यांच्या पथकातील एपीआय अभिनव पवार, महेश राऊत, पवार, सचिन ढोले, अनिल सोनावणे, विकास मस्के, कुंभार, गोसावी यांनी त्याला पंधरा वर्षांनंतर मालाड परिसरातून अटक केली. चौकशीत त्याचा घरफोडीच्या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले आहे.