
शशिकांत वारिसेप्रकरणी पत्रकार रस्त्यावर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार शशिकांत वारिसे हत्येप्रकरणी मुंबईतील पत्रकारांनी आंदोलन केले. वारिसे मृत्यूचा मास्टरमाईंड कोण, असा प्रश्न विचारत पत्रकार आज (ता. १०) रस्त्यावर उतरले होते. या वेळी पत्रकार वारिसे यांच्या कुटुंबाला सरकारने आर्थिक मदत करावी, अशी मागणी करण्यात आली.
मंत्रालयासमोरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ पत्रकार जमले होते. या वेळी वारिसे कुटुंबीयही हजर होते. वारिसे यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यास पकडले जाणे गरजेचे असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई यांनी व्यक्त केले. एवढी हिंमत होतेच कशी, असा प्रश्नही त्यांनी विचारला. शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबीयांना सरकारी नोकरी आणि घर देण्याची मागणी या वेळी करण्यात आली. वारिसे यांचा मृत्यू अपघाती नसून हा खून असल्याचे उपस्थितांनी सांगितले. या प्रकरणाशी संबंधित पंढरी आंबेरकर याची पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे. त्यामुळे या प्रकरणात जन्मठेपेची मागणीही करण्यात आली.