
‘शताब्दी नगरमधील कुटुंबांचे नव्या इमारतीत पुनर्वसन करा’
धारावी, ता. १२ (बातमीदार) : धारावी पुनर्विकास प्रकल्प गेली १९ वर्षे रखडला आहे. यातील शताब्दी नगर येथील १६० कुटुंबांचे त्वरित पुनर्वसन करावे, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या मुंबई अध्यक्षा साम्या कोरडे यांनी धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या उप जिल्हाधिकारी (विशेष भू-संपादन अधिकारी) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. धारावीच्या पुनर्विकासासाठी या भागाला पाच सेक्टरमध्ये विभागण्यात आले आहे. यातील पाचव्या सेक्टरचा विकास म्हाडातर्फे करण्याचे सरकारने काही वर्षांपूर्वी जाहीर केले होते. त्यानुसार यासाठी २२ मजल्यांच्या इमारती उभारण्याचे काम चालू करून यातील एका इमारतीत २०१८ मध्ये काही कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात आले आहे; तर नव्याने उभारण्यात आलेल्या इमारतींमध्ये शताब्दी नगर येथील कुटुंबांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.