
वसईच्या ‘सुकेळी’ भेटीने मुख्यमंत्री सुखावले
विरार, ता. १२ (बातमीदार) ः निसर्गसंपन्न वसईंचे मला नेहमीच आकर्षण वाटत आले आहे. वसईला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. तिथली खाद्यसंस्कृती हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय राहिलेला आहे. वसईच्या पानवेली आणि सुकेळी जगभरात प्रसिद्ध होत्या. शहरीकरणाच्या रेट्यात ही शेती मागे पडली, तरी भविष्यातील पिढीला ही खाद्यसंस्कृती माहीत असावी, यासाठी वसई-विरारकरांनी ती जपली पाहिजे, वाढवली पाहिजे. आज वसईच्या सुकेळीभेटीने मी तृप्त झालो आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वसईची खाद्यसंस्कृती आणि तिथल्या सुकेळींचा गोडवा सांगितला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना पालघर जिल्हाप्रमुख निलेश तेंडोलकर यांनी ठाण्यातील आनंद दिघे मठात त्यांची भेट घेतली. त्या वेळी तेंडोलकर यांनी वसईची सुप्रसिद्ध सुकेळी मुख्यमंत्र्यांना भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. या भेटीवेळी उत्तर भारतीय संघ जिल्हा संघटक प्रिन्स गणेश, उपतालुकाप्रमुख अतुल पाटील, अजित खांबे, वसई विधानसभा समन्वयक गणेश सुळे, शाखाप्रमुख प्रभाकर मेहेर, अमोल म्हात्रे, शशीम पाटील त्यांच्यासोबत उपस्थित होते.