
प्रेम प्रकरणातील वैफल्यातून आत्महत्या
नवी मुंबई, ता. १८ (वार्ताहर) ः वाशी येथील एका व्यक्तीचा आत्महत्या केल्याने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. निलेश सत्यवान सर्वेदे (वय ३५) असे मृताचे नावा आहे. प्रेम प्रकरणातील अपयशातून आलेल्या वैफल्यातून ही आत्महत्या झाल्याचे संशय वर्तवला जात आहे. त्यानुसार वाशी पोलिसांकडून या घटनेचा तपास करण्यात येत आहे.
निलेश सर्वेदे हा वाशी गावातील जगदिश कथोड सुतार यांच्या इमारतीत भाड्याच्या खोलीत आपल्या पुतण्यासोबत राहत होता. तो हाऊसकिपींगचे काम करत होता. शुक्रवारी (ता.१७) सकाळी निलेशचा पुतण्या बाहेर गेला होता. यावेळी निलेश घरामध्ये एकटाच होता. यावेळी मानखुर्द येथे राहणारा निलेशचा भाऊ दिनेश सर्वेदे हा निलेशच्या मोबाईलवर सतत कॉल करत होता. मात्र, तो फोन उचलत नव्हता. त्यामुळे संशय येऊन दिनेश निलेशला भेटण्यासाठी वाशीला आला. तेव्हा निलेश घरातील किचनमध्ये गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला.
याबाबतची माहिती मिळताच वाशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी त्याचा मृतदेह रुग्णालयात पाठवून दिला. या वेळी निलेशने मृत्यूपुर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी सापडली असून त्यात त्याने त्याच्यासोबत राहण्यास असलेल्या व त्याला सोडुन गेलेल्या महिलेचा उल्लेख केला आहे. त्यामुळे निलेशने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. वाशी पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करुन पुढील तपासाला सुरुवात केली आहे.