पहिले माझे कर्तव्य फाउंडेशनचा पुढाकार

पहिले माझे कर्तव्य फाउंडेशनचा पुढाकार

‘पहिले माझे कर्तव्य’तर्फे कर्करोगावर मात केलेल्यांचा गौरव
वेळेत निदान, उपचारांनी जीवनदान!
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : वेळेत झालेले निदान व उपचार कर्करोगाग्रस्‍तांसाठी जीवदान ठरतात, असे प्रतिपादन ‘पहिले माझे कर्तव्य’ या फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे. कर्करोगावर मात केलेल्या ११ वॉरियर्सचा नुकताच गौरव करण्यात आला. या वेळी मनसे नेत्या शर्मिला ठाकरे, रिटा गुप्ता या प्रमुख पाहुण्या म्‍हणून उपसिथत होत्या.
कर्करोग हा एक विनाशकारी आजार असून ज्यांनी त्यावर मात करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले, तसेच अशा रुग्णांच्या पाठी खंबीरपणे उभे राहणे महत्त्वाचे आहे. त्‍या दृष्‍टीने हा कार्यक्रम पार पडत असून या कार्यक्रमांमुळे कर्करोगाबद्दल जागरुकता आणि लवकर निदान, उपचार आणि समर्थन यांचे महत्त्व वाढण्यास मदत होऊ शकते, असे मत फाऊंडेशनतर्फे मांडण्यात आले.
पहिले माझे कर्तव्य फाऊंडेशनसारख्या संस्था कर्करोगापासून वाचलेल्यांच्या जीवनावर आणि त्यांच्या समुदायावर सकारात्मक प्रभाव पाडत आहेत, हे पाहून आनंद होतो असे शर्मिला ठाकरे यांनी सांगितले.

यांनी केली कर्करोगावर मात
धारावीत राहणाऱ्या ३७ वर्षीय शीतल म्हस्के यांनी काही महिन्यांपूर्वी कर्करोगावर मात केली. कोविडमध्ये त्यांच्या डाव्या स्तनात दुखू लागले. स्थानिक डॉक्टरांच्या तपासणीच्या अहवालात काहीच निदान झाले नाही. एक गाठ स्तनात दिसून येऊ लागली. ती गाठ डॉक्टरांनी काढून टाकली. त्या गाठीच्या बायोप्सीत ती कर्करोगाची गाठ असल्याचे निदान झाले. त्यानंतर पहिले माझे कर्तव्य फाऊंडेशनच्या सहकार्याने पुढील कर्करोगाची शस्त्रक्रिया केली गेली. आता त्‍या कर्करोगमुक्त आहेत. त्‍यांचा या वेळी सत्‍कार करण्यात आला.

जनजागृती आवश्यक
नवी मुंबईत राहणाऱ्या आणि एमजीएम या रुग्णालयात वरिष्ठ पदावर काम करणाऱ्या शर्मिला सरकार यांच्‍या वार्षिक आरोग्य तपासणीत त्यांना स्तनात एक छोटी गाठ दिसली. तात्काळ त्यांनी तपासणी केली. रुग्णालयातील ऑन्कोलॉजीस्ट यांची भेट घेतली आणि छोटी गाठ काढून १५ रेडिएशन थेरपीचे सेशन पूर्ण केले. निदान लवकर झाल्याने एका महिन्याच्या सुट्टीनंतर त्‍या पुन्हा कामावर रुजू झाल्‍या. कर्करोगासंदर्भातील मी स्वतःसुद्धा समुपदेशन करते. त्यामुळे जर लवकर निदान आणि तात्काळ उपचार सुरू केले की जीव वाचतो आणि सर्वसामान्य आयुष्य जगता येते. कर्करोगाची जास्तीत जास्त जनजागृती करणे आवश्यक असून पुरस्‍कार घेतल्यानंतर ही जबाबदारी आणखी वाढल्याचेही सरकार यांनी सांगितले.

संस्थेमार्फत ज्या कर्करोगग्रस्तांनी कर्करोगावर मात केली आहे त्यांचा सत्कार केला. समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांमध्ये ही मंडळी राहतात. वेगवेगळ्या आणि चांगल्या क्षेत्रात कार्यरत आहेत, पण कर्करोगाचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो. त्यामुळे लवकर निदान होणे गरजेचे आहे. मग उपचार करणे सोपे होते.
- नयना कनल, संस्थापिका व अध्यक्षा, पहिले माझे कर्तव्य फांऊडेशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com