
कबुतरांना खाणे टाकणे पडेल महागात
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ : कबुतरांच्या पिसांसह विष्ठेतून बाहेर पडणाऱ्या जंतूंमुळे आजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कबुतरांना उघड्यावर खाद्यपदार्थ टाकू नका, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. आता कबुतरांना खाद्यपदार्थ टाकताना आढळून आल्यास पाचशे रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाने जाहीर केले आहे. त्यामुळे कबुतरांना खाणे टाकणे महागात पडणार आहे.
मोकळ्या जागांवर कबुतरांना खाद्य पदार्थ टाकले जाते. मात्र, आता कबुतरांपासून सावधान राहण्याचे आवाहन करत त्यांना खाद्यपदार्थ टाकण्यास पालिका प्रशासनाने मनाई केली आहे. या संबंधीचे फलक शहरातील विविध भागांत पालिका प्रभाग समितीच्या माध्यमातून लावण्यात आले आहेत. कबुतरांच्या पिसांसह विष्ठेतून बाहेर पडणाऱ्या जंतूंमुळे ‘हायपर सेंसिटिव्ह न्यूमोनिया’चा (एचपी) आजार बळावण्याचे प्रमाण पुण्यासह मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. फुप्फुसांशी संबंधित आजार झालेल्यांमध्ये हा आजार होण्याचे प्रमाण सर्वाधिक ६० ते ६५ टक्के आहे. त्यामुळेच कबुतरांना उघड्यावर खाद्यपदार्थ टाकल्यास पाचशे रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.