
विक्रमगडमध्ये अवकाळी पाऊस
विक्रमगड, ता. ५ (बातमीदार) : हवामान बदलामुळे शेतकरी त्रस्त झालेला आहे. अशात रविवारी पहाटे अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे वीट उत्पादकांसह आंबा बागायतदारांचे नुकसान झाले आहे. साधारणपणे पाऊण तासानंतर या पावसाने विश्रांती घेतली.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार रविवारी पहाटे ३.३० वाजता तालुक्यातील काही भागांत अचानक विजेच्या गडगडाटासह अवकाळी पावसाच्या सरी बरसू लागल्या. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्याची तसेच रब्बी पिके यात तूर, हरभरा, वाल काढणीस शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. या अवकाळी पावसाने शेतकऱ्याची तारांबळ उडाली. तसेच वीटभट्टी मालकांची दाणादाण उडाली. आंबा बगायतदारांचेही यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. आंब्याच्या झाडांवर फळधारणेची प्रक्रिया सुरू झालेली असताना पावसाच्या माऱ्याने झाडावरील फळे गळून पडली आहेत. त्यामुळे आंबा बागायतदाराचे मोठे नुकसान होणार आहे. काही दिवसांपासून तालुक्यात तापमानात चढ-उतार होत आहे. आज रविवारी पहाटे अचानक विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची सुरुवात झाली. साधारणपणे पाऊण तासांनी या पावसाने विश्रांती घेतली. या पावसामुळे तालुक्यातील शेतकरी, आंबा बागायतदार आणि वीटभट्टी चालकांचे मोठे नुकसान झाले आहे.