
वादळामुळे मच्छीमारांचे नुकसान
बोर्डी, ता. ७ (बातमीदार) : ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे शेतकरी व आंबा बागायतदारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. मागच्या दोन-तीन दिवसांपासून डहाणू तालुक्यात सर्वत्र ढगाळ वातावरण झाले असून वातावरणात प्रचंड उष्णता वाढली आहे. सोमवारी (ता. ६) सकाळपासून आभाळ ढगाने भरून आले. दुपारी सव्वाबाराच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. चालू वर्षी सुरुवातीच्या हंगामात मच्छीमारी बेताचीच झाली. संक्रांतीनंतर मच्छीमारीला सुगीचे दिवस आले होते. मागच्या अमावस्येच्या भरतीला चांगली मासेमारी झाल्यामुळे होळी पौर्णिमेच्या वेळेस समुद्राच्या भरतीत चांगला मासा मिळेल, या आशेने झाई बंदरातील मच्छीमारांनी शनिवारी व रविवारी आपल्या नौका मासेमारीसाठी समुद्रात उतरवल्या आहेत. मात्र अचानक ढगाळ वातावरण व पावसाला सुरुवात झाल्यामुळे समुद्रात गेलेल्या नौकांतील खलाशांना ताबडतोब परतून येण्यासाठी किनाऱ्यावरून संदेश पाठवण्यात आला आहे. त्यामुळे मच्छीमारांची ही खेप वाया जाणार व मच्छीमारीसाठी केलेला खर्चाचा बोजा वाढणार, अशी भीती मच्छीमारत व्यक्त करीत आहेत.