
आंबा प्रेमींसाठी बाजारात आनंदवार्ता
वाशी, ता. २३ (बातमीदार)ः गुढीपाडव्यापासून आंबा मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल होण्यास सुरुवात होते. आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठेत असलेल्या एपीएमसी मार्केटमध्येदेखील राज्यभरातून आंबा दाखल होत आहे. त्यामुळे आब्यांचे चढे दर कमी होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तवली जात आहे.
कोकणातून विविध जातीचे आंबे एपीएमसी परिसरात दाखल झाले आहेत. रत्नागिरीचा हापूस आणि देवगड आंब्यांबरोबरच बाकी जातीच्या आंब्यांनाही चांगली मागणी आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत शेकडो आंब्यांच्या पेट्या दाखल झाल्या आहे. बाजारात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड तसेच परराज्यातून कर्नाटक आणि केरळ येथून आंब्याची आवक होत आहे. यंदा पहिल्या टप्प्यातील हापूस बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याने खरेदीसाठी नागरिकांनी बाजारपेठांमध्ये गर्दी केली आहे. सध्या आंब्याचे दर चढे आहेत, पण आवक जशी वाढले तसे दर कमी होण्याचे संकेत विक्रेत्यांकडून दिले जात आहेत.
---------------------------
अवकाळी पावसाचा फटका
राज्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडला. या पावसामुळे काही ठिकाणी आंब्यावर बुरशीजन्य रोगाची लागण झाली होती. त्यात काही परिसरात तापमानातील उच्चांकामुळे आंब्यावर काळे डागदेखील पडले आहेत. मात्र, त्याचा फटका बसूनही आंब्यांच्या दर मात्र अजूनही चढेच आहेत.
---------------------------
कर्नाटकचा हापूस दाखल
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रत्नागिरी हापूस आंब्याबरोबरच कर्नाटकचा हापूस आंब्यांचीही मार्केटमध्ये विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर आवक होते. या दोन्ही आंब्यांच्या किमतीत फारसा फरक नसतो. मात्र, चवीत मोठी तफावत असते.
------------------------------
सध्याचे आंब्याचे दर ः
एक डझन ः ८००, १००० ते १२०० रुपये.
एका पेटीसाठी ः तीन ते साडेतीन हजार रुपये.