जलवाहतुकीच्या कामास गती द्या

जलवाहतुकीच्या कामास गती द्या

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ : ठाणे, नवी मुंबई व मिरा-भाईंदर या तीन महापालिका क्षेत्रांना जोडणाऱ्या जलमार्गासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डमार्फत प्रवासी जेट्टी उभारण्यात येत आहेत. या कामांची स्थिती आणि चौपाटीच्या कामांचा आढावा घेण्यासाठी मुंबई येथे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. जलवाहतुकीच्या कामांना गती द्यावी, अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी यांच्याकडे केली.

राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक ५३ मधील पहिल्या टप्प्यातील कोलशेत, काल्हेर, मिरा-भाईंदर, जैसल पार्क, तसेच डोंबिवली येथे जेट्टीची कामे सुरू करण्यास विलंब का होत आहे, असे विचारण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी यांनी सांगितले, की या जेट्टीची कामे सुरू करण्यासाठी निविदा काढण्यात आली होती, परंतु प्रतिसाद न मिळाल्याने पुन्हा निविदा प्रक्रिया सुरू करणार आहे. तसेच राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक ५३ अंतर्गत टप्पा दोनमधील ऐरोली येथे जैवविविधता केंद्र येथे असणारी जेट्टी विकसित करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. या कामासाठी ३२.८५ कोटी रकमेचे अंदाजपत्रक प्रशासकीय मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले.

ठाणे व ऐरोली या खाडीदरम्यान जलवाहतुकीला अडथळा ठरणारा रॉक ड्रेजिंग करण्यासाठी ४४० कोटीची प्रशासकीय मान्यता मिळाली असून याचेही काम लवकर सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली. कोलशेत चौपाटी काम पूर्ण झाले असून त्या ठिकाणी पर्यटकांना सुविधा मिळवून देण्यासाठी व या चौपाटीची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी निविदा काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. फाऊंटन जेट्टीचे काम ९५ टक्के झाले आहे. या वेळी भाईंदर उत्तन किनारपट्टीवरील मच्छीमारांच्या सोयीसाठी सुरू असलेल्या कामांचा आढावाही त्यांनी घेतला.


भाईंदर ते वसई रो-रो सेवा जूनपर्यंत सुरू करू
भाईंदर ते वसई रो-रो सेवा सुरू करण्याच्या कामास मंजुरी मिळाली आहे. भाईंदरवासीयांना वसई येथे जाण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी मार्गावरून राष्ट्रीय महामार्गावर वर्सोवा पुलामार्गे ४० किमीचा वळसा मारून जावे लागत होते. तो त्रास आता कमी होणार असून भाईंदर पश्चिमेकडील तयार झालेल्या जेट्टीवरून आपली वाहने बोटीत टाकून सात किमीचा पट्ट्यासाठी वसई येथे जाण्याकरिता २० मिनिटांत सोय उपलब्ध होणार आहे. वसई येथील जेट्टीचे ७० टक्के काम पूर्ण झाले असून जून अखेरपर्यंत जय भवानी कंपनीमार्फत बोट सेवा सुरू करण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. भाईंदर ते वसई रो-रो बोट सेवेचा एक थांबा डोंगरी चौक जेट्टीवर घेण्याचाही विचार करण्यात येईल, असे सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com