पाण्याच्या वापराची ऑनलाईन नोंद

पाण्याच्या वापराची ऑनलाईन नोंद

प्रकाश लिमये : भाईंदर
नागरिकांकडून केल्या जाणाऱ्‍या पाण्याच्या वापराची मिरा-भाईंदर महापालिकेत ऑनलाईन नोंद होणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात व्यावसायिक आस्थापनांच्या वाणिज्य नळजोडण्यांवर स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहेत. या स्मार्ट मीटरमधील सीम कार्डमुळे वापरकर्त्याने पाण्याचा किती वापर केला याची अचूक माहिती महापालिकेच्या कर्मचाऱ्‍याला घेता येणार आहे. यामुळे अचूकता व पारदर्शकता निर्माण होणार असून कर्मचाऱ्‍यांवरील कामाचा ताण कमी होणार असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.
व्यावसायिक आस्थापनांच्या नळजोडणीवर स्मार्ट मीटर बसविण्याबाबत महापालिकेकडून व्यावसायिक आस्थापनांना याआधी आवाहन करण्यात आले होते; परंतु त्याला प्रतिसाद न मिळाल्याने आता महापालिकेकडून दहा दिवसांत स्मार्ट मीटर बसविण्याच्या नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत. शहरात एकंदर साडेतीन हजार वाणिज्य नळजोडण्या आहेत. त्यांना एक हजार लिटरसाठी ६५ रुपये इतका दर महापालिकेकडून आकारण्यात येतो. नळजोडण्यांना बसविण्यात आलेली सध्याची जुन्या पद्धतीची मीटर वारंवार नादुरुस्त होतात, त्यांचे रिडिंग घेण्यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्‍यांना प्रत्यक्ष जागेवर जावे लागते. अनेक वेळा खराब मीटरमुळे चुकीची नोंद होते व देयकेही चुकीची दिली जातात. यात नागरिकांचे तसेच महापालिकेचेही नुकसान होत असते. यासाठी आता वाणिज्य वापराच्या नळजोडण्यांसाठी अल्ट्रासोनिक स्मार्ट मीटर बसविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
व्यावसायिक आस्थापनांना येत्या दहा दिवसांत हे मीटर बसवून घ्यावे लागणार आहे. हे स्मार्ट मीटर पालिकेने निश्चित केलेल्या कंपनीकडून खरेदी करावे लागणार आहे. मिरा रोडमधील महापालिकेच्या विलासराव देशमुख भवन या ठिकाणी स्मार्ट मीटर उपलब्ध करण्यात आले आहे. त्यासाठी आकारले जाणारे दरदेखील प्रशासनाकडून निश्चित करण्यात आले आहेत. या मीटरच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी संबंधित कंपनीची असणार आहे.
....
असे असणार स्मार्ट मीटर
स्मार्ट मीटरमध्ये एक सिम कार्ड बसविण्यात आलेले असते. त्याद्वारे ग्राहकाला दैनंदिन झालेल्या पाणीपुरवठ्याची अचूक माहिती महापालिकेला ऑनलाईन मिळणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्‍याला जागेवर जाऊन नोंद घेण्याची आवश्यकता भासणार नाही. पाण्याच्या देयकाची रक्कम न भरणाऱ्‍यांचा पाणीपुरवठा या सिम कार्डद्वारे खंडित करणेही शक्य होणार आहे.
....
तक्रारी कमी होणार
पाण्याचे मीटर खराब झाल्याच्या, चुकीच्या नोंदी झाल्याच्या असंख्य तक्रारी महापालिकेकडे येत असतात. आता स्मार्ट मीटरमुळे सदोष मीटरची संख्या कमी होणार आहे. तसेच नोंदीमध्ये अचूकता येणार आहे. परिणामी ग्राहकांचेही नुकसान टळणार आहे व महापालिकेचे उत्पन्नदेखील वाढणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.
...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com