आंबेडकरी समाजाने देशाला बाबासाहेबांच्या आयुष्यातील मोल घेऊन लढायला शिकवले - राजू परुळेकर

आंबेडकरी समाजाने देशाला बाबासाहेबांच्या आयुष्यातील मोल घेऊन लढायला शिकवले - राजू परुळेकर

आंबेडकरी समाजाने देशाला लढायला शिकवले!
अभ्यासक राजू परुळेकर यांचे प्रतिपादन

वडाळा, ता. २२ (बातमीदार) ः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाजासाठीचे योगदान मोठे आहे. आंबेडकरी समाजाने देशाला बाबासाहेबांच्या आयुष्यातील मोल घेऊन लढायला शिकवले. आजही कोणत्याही लढ्यात आंबेडकरी चळवळ असेल तर तो यशस्वी होण्याची जास्त शक्यता असते, असे मत मुलाखतकार, लेखक, व्याख्याते आणि पत्रकार राजू परुळेकर यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या ‘१३२ व्या जयंती महोत्सवा’त ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
मुंबई पोर्ट प्राधिकरण एससी, एसटी ॲण्ड ओबीसी वेल्फेअर असोसिएशन यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १३२ वा जयंती महोत्सव गुरुवारी (ता. २०) बॅलार्ड इस्टेटमधील विजयदीप कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. प्रमुख वक्ते म्हणून राजू परुळेकर, प्रमुख मार्गदर्शक मुंबई पोर्ट प्राधिकरण एससी, एसटी ॲण्ड ओबीसी वेल्फेअर असो.चे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश माने, कार्यकारी अध्यक्ष अंकुश कांबळे, गिरीष कांबळे, अशोक वडगावकर, सरचिटणीस संजीवन थोरावडे, संघटक सचिव प्रदीप कांबळे, संजय बेडेकर आणि विजय कांबळे, खजिनदार प्रदीप नवरे आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.
राजू परुळेकर म्हणाले, की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण स्मरण करीत असताना सर्वांनी निश्चय केला पाहिजे, की त्यांच्या विचारांच्या विरोधात बोलले गेलेले वा लिहिले गेलेले एकही पाऊल हे आपल्या जीवनावर घातलेला घाला आहे असे समजून जिवाच्या कराराने आपण लढायला उभे राहिले पाहिजे. हे जर आपण केले नाही, तर आपण गुलाम होणारच आणि येणाऱ्या पुढच्या पिढीसमोर ते संचित ठेवणार. त्या संचितातून मुक्ती मिळवण्याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखा माणूस जन्माला यावा लागेल. त्यासाठी पुन्हा कित्येक वर्षे वाट बघायची आहे का?की आपल्याला एकच बाबासाहेब पुरे आहेत हे ठरवण्याची वेळ आली आहे. त्यांच्यासारखे होण्याकरिता आणि लढण्यासाठी प्रत्येकाने तयार होणे हाच त्यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांना आपण केलेला खराखुरा जय भीम असेल, अशा शब्दांत परुळेकर यांनी आपले विचार मांडले.
महापुरुषाला शोभणारे असे चांगले अनुयायी आपण बनू शकतो. प्रामाणिक प्रयत्न केला तर आपणही त्या वाटेचे चांगले वाटसरू ठरू. योगदान देऊन प्रमाणिकपणे काम करणारे कार्यकर्ते बनू, अशी भूमिका महापुरुषांच्या जयंतीनिमित्त सर्वांनी सातत्याने बाळगू या, असे आवाहन सुरेश माने यांनी केले.
कार्यक्रमाची संकल्पना महेंद्र कदम व निवेदन संदेश कर्डक यांचे होते.


‘धम्म स्वर संगीत’ कार्यक्रम
‘जयंती महोत्सवा’निमित्त ‘धम्म स्वर संगीत’ कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. प्रमुख गायक म्हणून संगीता कदम, गजेंद्र कोहचडे, सुधीर मकासरे आणि जालिंदर हिरे यांनी प्रेक्षकांची दाद मिळवली. त्यांना प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com