आरोग्यपूर्ण महाराष्ट्राचे ध्येय- मुख्यमंत्री

आरोग्यपूर्ण महाराष्ट्राचे ध्येय- मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : ‘आरोग्यपूर्ण महाराष्ट्र हे आपले ध्येय आहे. सर्वसामान्यांच्या आयुष्यात बदल घडवण्याचा आपला प्रयत्न आहे. त्या दिशेने आपला आरोग्य विभाग काम करत आहे, याचे समाधान आहे,’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजनेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत विस्तार करण्यात आला. या योजनेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डिजिटल अनावरण करण्यात आले.
महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यातील ३१७ तालुक्यांच्या ठिकाणी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजना सुरू करण्यात आली. यातून आता गरजूंसाठी घराजवळ उपचार सुविधा उपलब्ध होणार आहे. यात सुमारे ३० चाचण्या मोफत करण्यात येतील. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, कोरोनाने आरोग्य व्यवस्थेच्या सक्षमीकरणाचा धडा दिला आहे. छोट्या-छोट्या आजारांवरील उपचारासाठी मोठ्या रुग्णालयांचा ताण कमी करावा लागेल. आता संपूर्ण राज्यात आपला दवाखाना सुरू होत आहे. मुंबईत सुमारे २५० दवाखाने कार्यरत आहेत. या योजनेमुळे ग्रामीण भागात सुलभ आणि परवडणारी आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. आरोग्य विभागांतर्गत ही नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रे १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत स्थापित केली जाणार आहेत.
...
मुख्यमंत्री निधीतून ५२ कोटी
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत ६ हजार २०० रुग्णांना एकूण ५२ कोटी रुपयांहून अधिकची मदत केली गेली आहे. महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना या एकत्रित योजनेअंतर्गत लाखो रुग्णांना उपचाराचा लाभ मिळाला आहे. यापुढे जिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये या सर्वच ठिकाणी आरोग्य सेवा सक्षम करण्याचा प्रयत्न आहे, असेही या वेळी सांगण्यात आले.
...
जनआरोग्य योजनेत पाच लाख
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या दवाखान्याच्या माध्यमातून ३० सेवा, औषध आणि वैद्यकीय सल्लादेखील मोफत मिळणार आहे. जवळपास ५०० दवाखाने सुरू करण्यात येणार आहेत. त्यातील आज ३१७ दवाखाने सुरू होत आहेत. महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेत उपचारांची मर्यादा पाच लाखांपर्यंत वाढवली आहे. यात आता ९०० शस्त्रक्रिया मोफत करता येतात. प्रधानमंत्री आरोग्य योजनेतून पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार होतात. अशा रीतीने राज्यातील सुमारे आठ कोटी लोकांना आता मोफत उपचार मिळू लागले आहेत.
...
चार लाख महिलांची तपासणी
आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत म्हणाले, ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ या मोहिमेत सुमारे ४ लाख ३९ महिलांची तपासणी झाली असून त्यांच्यावर ७० टक्के उपचारदेखील पूर्ण केले आहेत. सुदृढ बालक योजनेचीही यशस्वी अंमलबजावणी सुरू आहे. मेळघाटातील कुपोषण मुक्तीबाबत काम सुरू आहे. औषध प्राधिकरणाची निर्मिती, जनआरोग्य योजना, तसेच आरोग्य विभागात पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यावर भर देत आहोत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com