हुतात्मा स्मारकांचे नशीबवान सेवेकरी!

हुतात्मा स्मारकांचे नशीबवान सेवेकरी!

मुंबई, ता. १ : संयुक्त महाराष्ट्र स्थापनेच्या आंदोलनात आपल्या प्राणांची आहुती देऊन अनेकांनी हौतात्म्य पत्करले. त्या हुतात्म्यांच्या स्मृती कायमस्वरूपी राहाव्यात आणि राज्यातील युवा पिढीला स्फूर्ती मिळावी म्हणून २१ नोव्हेंबर १९६१ रोजी हुतात्मा स्मारकाची उभारणी राज्य सरकारने केली. स्मारकाच्या देखभालीची जबाबदारी पालिका कर्मचारी वर्षानुवर्षे करत आहेत. गेली २९ वर्षे सुरेश सरवणकर यांनी हुतात्मा स्मारकाची सेवा केली. गेल्या महिन्यात ते निवृत्त झाले; परंतु त्यानंतरही स्मारकाच्या ठिकाणी काम करण्याची इच्छा त्यांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केली.

संयुक्त महाराष्ट्रासाठीच्या आंदोलनात २१ नोव्हेंबर १९५५ रोजी आणि त्यानंतर पुढील संघर्षकाळात प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ राज्य सरकारने २१ नोव्हेंबर १९६१ रोजी हुतात्मा स्मारकाची उभारणी केली. स्मारकाच्या देखभालीची जबाबदारी मुंबई महापालिकेडे आहे. महापालिकेच्या अभियांत्रिकी आणि उद्यान विभागाकडून स्मारकाची देखरेख केली जाते. त्यासाठी पालिकेने आपल्या काही कर्मचाऱ्यांची कायमस्वरूपी नियुक्ती केली आहे. पुतळ्याची निगा, स्मारकाचे रंगकाम, स्मारकातील बगिचा, धगधगती मशाल आणि झाडांना पाणी देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यातील अनेक कर्मचारी वर्षानुवर्षे हुतात्मा स्मारकाची निगा राखत आले आहेत.

सदैव धगधगणारी ज्योत
हुतात्मा स्मारकाच्या सर्व कामांवर देखभाल ठेवण्याची जबाबदारी सुरेश सरवणकर यांच्यावर होती. २९ वर्षे आपली जबाबदारी त्यांनी चोख बजावली. नुकतेच ३१ मार्च २०२३ रोजी ते निवृत्त झाले. आपल्या भावना व्यक्त करताना ते सांगतात, ‘नोकरीतील सर्वाधिक वर्षे मी हुतात्मा स्मारकाच्या सेवेत काढली. स्मारकातील कामाची जबाबदारी मोठी आहे. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो; कारण मला स्फूर्तिस्थळावर काम करण्याची संधी मिळाली. मी निवृत होऊन आता महिना होत आहे; परंतु आजही हुतात्मा स्मारकाची सदैव धगधगत राहणारी ज्योत माझ्या डोळ्यासमोर येते. पुन्हा काम करण्याची इच्छा होते. वयोमान आणि शासनाच्या नियमानुसार मला निवृत्त व्हावे लागले. हुतात्मा स्मारकाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मुंबई पालिका प्रशासनाचेही आभार.’

ऊर भरून येतो!
दीपक झगडे २५ वर्षांपासून हुतात्मा स्मारकावर रंगरंगोटीचे काम पाहतात. ते सांगतात, की दीर्घकाळापासून मी हुतात्मा स्मारकात काम करत आहे. २१ नोव्हेंबर आणि १ मे असे वर्षातील दोन दिवस रंगरंगोटी केली जाते. विशेष सोनेरी रंगाने हुतात्म्यांच्या नावांची रंगरंगोटी करण्याचे काम माझ्यावर आहे. हुतात्म्यांच्या नावावरून हात फिरवताना ऊर भरून येतो. मला अभिमान वाटतो. हे काम करण्याची संधी मिळाल्याने मी स्वतःला नशीबवान समजतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com