गद्दारीच्या सरकारविरोधात ‘वज्रमूठ’ बांधा

गद्दारीच्या सरकारविरोधात ‘वज्रमूठ’ बांधा

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई, ता. १ : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे जनतेच्या मनातले सरकार नाही. गद्दारी करून आलेले सरकार आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा मान-सन्मान आणि स्वाभिमान परत मिळवण्यासाठी या गद्दारीच्या सरकारविरोधात महाविकास आघाडीची भक्कम ‘वज्रमूठ’ बांधा, असे आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज केले. बीकेसीच्या मैदानावरील‘वज्रमूठ’ या सभेत बोलताना पवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान, माध्यमांत काहीही वावड्या उठवून ‘मविआ’तील नेत्यांबाबत संशयकल्लोळ निर्माण केला जात असला, तरी संभ्रमित होऊ नका, अशी विनंतीही त्यांनी या वेळी केली.

मुंबईचा मान-सन्मान वाढवण्याचे काम केले ते फक्त हिंदुहृहयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी. हेच विरोधकांच्या डोळ्यात खूपत होते, म्हणून त्यांनी शिवसेना फोडण्याचे काम केले; पण जनता आपल्यासोबत आहे हे विविध पोटनिवडणुका, विधान परिषद निवडणुका आणि आता कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निकालाने दाखवून दिले आहे. त्यामुळे आपण एकत्रपणे वज्रमूठ बांधून काम करू या. दोन पावले पुढे-मागे झाली तरी तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने महाविकास आघाडीच्या उमेदवाराचाच प्रचार करायचा, हे लक्षात ठेवण्याची सूचनाही अजित पवार यांनी केली. राज्य सरकारने आर्थिक शिस्त बिघडवली आहे. १ लाख २८ हजार कोटींची बिले लटकली आहेत. जनता त्रस्त आहे; पण शिंदे-फडणवीस सरकार भलत्याच कामात व्यस्त आहे. कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असताना हे सरकार जबाबदारी घेत नाही, असा टोलाही पवार यांनी लगावला.

राज्यातील जनतेच्या मनात सरकारविरोधात राग असल्याने सरकार निवडणुका घ्यायला घाबरतेय, असे सांगत अजित पवार म्हणाले, की यांच्या मनात पराभवाची भीती आहे. जनता यांना स्वीकारणार नाही हे त्यांना माहीत आहे. म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे सरकार घेत नाही. याउलट राज्यातील सर्व महापालिकांचा कारभार हे दोघेच करत आहेत. वारेमाप पैशांची उधळपट्टी सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने या सरकारला नपुंसक सरकार म्हटले, तरी या सरकारला ना जनाची ना मनाची उरली, असा संतापही पवार यांनी व्यक्त केला.

जाहिरातींवरून निशाणा
शिंदे-फडणवीस सरकार हे घोटाळा करूनच सत्तेत आल्याची टीका करताना पवार म्हणाले, की प्रसिद्धीसाठी जनतेच्या पैशांची वारेमाप उधळपट्टी सुरू आहे. यशवंतराव चव्हाण ते उद्धव ठाकरे यांच्या काळातील खर्च काढा आणि या सरकारच्या १० महिन्यांतील खर्च काढा. मग कळेल, की सर्व मुख्यमंत्र्यांनी जाहिरातींवर केलेला खर्च कुठे अन् शिंदे सरकारचा खर्च कुठे, अशा शब्दांत त्यांनी सरकारला सुनावले. आपापल्यात दुरावा निर्माण होऊ देऊ नका. जात, धर्म, पंथात दुरावा पाडून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचे काम शिंदे-फडणवीस सरकारचे सुरू आहे. या षड्‍यंत्राला बळी पडू नका, असे आवाहनही अजित पवार यांनी केले.

‘हमारे पास जनता जनार्दनाची शक्ती’
दिवार चित्रपटातील संवादासारखे भाजप नेते म्हणतात, की ‘मेरे पास बंगला है, गाडी और पैसा है... तुम्हारे पास क्या है’; पण त्यांना आम्ही एकच सांगू इच्छितो, की महाविकास आघाडी के पास जनता जनार्दनाच्या आशीर्वादाची शक्ती आहे, असा पलटवार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com