पाण्यासाठी महिलांची डोंगराची पायपीट

पाण्यासाठी महिलांची डोंगराची पायपीट

खर्डी, ता. २ (बातमीदार) : दोन वर्षांपूर्वी उठावा येथे बोअरवेलची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती; परंतु ठेकेदाराने हे काम अर्धवट अवस्थेत बंद करून तो गायब झाल्याने येथील आदिवासी बांधवांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाणी आणण्यासाठी त्यांना दोन ते तीन किलोमीटरपर्यंत डोंगरदऱ्यावर चढउतार करून ये-जा करावी लागत आहे.
पाणी योजना बंद असली, तरी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी मूग गिळून गप्प बसले आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने ही अर्धवट योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे; परंतु ठेकेदाराचा ठावठिकाणा लागत नसल्याने निधी असूनही ही योजना पूर्ण करण्यासाठी तांत्रिक अडचण येत आहे. पाणीपुरवठा विभागाने येथील पाणीटंचाई दूर करण्यासाठी तांत्रिक अडचणी दूर करून ही योजना पूर्ण करण्याची परवानगी ग्रामपंचायतीला देण्याची गरज आहे.
शहापूर तालुक्यातील अजनुप ग्रामपंचायती हद्दीतील व मध्य वैतरणा धरणाच्या वर वसलेल्या उठावा या आदिवासी पाड्यात पाण्याचा कोणताही स्त्रोत नसल्याने येथील रहिवाशांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. येथील महिलांना पाणी आणण्यासाठी डोंगरदऱ्या पार करून कसरत करून तीन किलोमीटरवरील मध्य वैतरणा धरणातून डोक्यावरुन हंडे आणावे लागत आहेत.

-----------------
बोअरवेल, विहिरीने तळ गाठला
अजनुप ग्रामपंचायतीमधील उठावा ही ६० घरांची वस्ती असून ३५० लोकसंख्या आहे. पण सद्यस्थितीत येथील विहिरीचे पाणी आटले आहे. शिवाय बोअरवेललासुद्दा पाणी नाही. त्यामुळे येथील रहिवाशी पाण्यासाठी वणवण फिरत आहेत. उठाव्याच्या खालच्या बाजूला तीन किलोमीटरवर मध्य वैतरणा धरणाचे जलस्त्रोत असल्याने डोंगर दऱ्यातून ठेचकळत, पडत पाण्यासाठी ये-जा करावी लागते. संपूर्ण कुटुंबातील लोकांना पाण्यासाठी कसरत करावी लागत असल्याने येथील रहिवाशी हैराण झाले आहेत.

--------------------
सौरऊर्जा प्रकल्पावर योजना मंजूर
उठावा गावासाठी प्रादेशिक नळ योजना होती; परंतु तीन किलोमीटरवरून पाणी उचलणे शक्य न झाल्याने ही योजना दोन वर्षांपूर्वीच बंद पडली आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत सौरऊर्जा प्रकल्पावर बोअरवेलच्या सहायाने पाणीपुरवठा योजना मंजूर करून तिचे काम सुरू करण्यात आले होते; परंतु संबंधित ठेकेदार काम अर्धवट करून गायब झाल्याने ही योजना आजतागायत बंद आहे.

----------------------
अजनुप ग्रामपंचायतीने ही योजना सुरू करण्यासाठी प्रयत्न केले; परंतु अर्धवट अवस्थेत असलेल्या योजनेचा पुढील खर्च केल्यास त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता नसल्याने ती योजना त्यांनीही तशीच बंद ठेवली आहे. योजना ठेकेदाराने तात्काळ पूर्ण करून द्यावी किंवा या योजनेचे पुढील काम ग्रामपंचायतीने करावे असे पत्र ठेकेदाराने द्यावे. त्यानंतर या योजनेचे काम पूर्ण करण्याची आमची तयारी आहे.
शांताराम भगत, सरपंच, अजनुप

--------------------------
जिल्हा परिषदेने येथील पाणीटंचाई कायमस्वरूपी घालवण्यासाठी मध्य वैतरणा धरणावरून पाणीपुरवठा योजना मंजूर करावी. बंद अवस्थेत असलेली बोअरवेल योजना तात्काळ दुरुस्त करावी.
- योगेश झारगडे, सदस्य, अजनुप

--------------------
पाणी योजनेचे काम तत्कालीन ग्रामपंचायत व ठेकेदार यांच्यात तांत्रिक अडचण झाल्याने ठेकेदाराने काम अर्धवट अवस्थेत बंद केले होते. सद्यस्थितीत तीव्र पाणीटंचाई असल्याने ग्रामपंचायतीने आपल्या स्तरावर या योजनेचे उर्वरीत काम पूर्ण करून घ्यावे. त्या कामाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल.
- संजय सुकटे, उपअभियंता, पाणीपुरवठा यांत्रिकी विभाग, ठाणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com